ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांसाठी ५०० नव्या रुग्णवाहिका

ग्रामीण भागात ५०० नव्या रुग्णवाहीका देण्यात येणार

Updated: Jul 29, 2020, 04:53 PM IST
ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांसाठी ५०० नव्या रुग्णवाहिका title=

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागांमधील रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये वर्षानुवर्षे जुन्या रुग्णवाहीका कार्यरत होत्या. या रुग्णवाहीका टप्प्याटप्प्याने बदलण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पीय भाषणात दिले होते. त्याची पूर्तता करण्यास सुरुवात झाली आहे. ग्रामीण भागात ५०० नव्या रुग्णवाहीका देण्यात येतील अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. 

बऱ्याच आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिका जुनाट झाल्या आहेत. त्या दुरूस्ती योग्य न राहिल्याने काढून टाकण्यात आल्यायत. यावर्षी ५०० नव्या रुग्णवाहिका घेण्यासाठी ८९ कोटी ४८ लाख इतका खर्च अपेक्षित असून याला मान्यता देण्यात आलीय. त्यामुळे आता महिन्याभरात ५०० रुग्णवाहीका रुग्णांच्या सेवेसाठी उपलब्ध होतील अशी माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली. या रुग्णवाहिका २५३ प्राथमिक आरोग्य केंद्र, १३७ ग्रामीण रुग्णालये, १०६ जिल्हा व उप जिल्हा तसेच स्त्री रुग्णालये आणि ४ प्रादेशिक मनोरुग्णालये यांना देण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

आरोग्य केंद्रातील जुन्या झालेल्या १००० रुग्णवाहिका टप्प्या टप्प्याने बदलून त्याजागी नविन रुग्णवाहिका देण्याची घोषणा उपमुख्यमंत्र्यांनी केली होती. यावर्षी ५०० आणि पुढच्या वर्षी ५०० अशा नविन रुग्णवाहिका देण्यात येतील असे त्यांनी जाहीर केले होते.

गामीण भागातील शासकीय आरोग्य यंत्रणेच्या रुग्णवाहिका या कायमच टिकेचा विषय ठरतात. ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेला बळकटी देण्यात येत असून आता नविन रुग्णवाहिका आल्यावर ग्रामीण व दुर्गम भागातील जनतेला अधिक चांगल्या प्रकारे आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी मदत होणार आहे.