मोदीजी, ही शेतकऱ्यांशी बेईमानी नाही तर काय, बच्चू कडुंचा सवाल

मोदी सरकारने पुन्हा शेतकऱ्याच्या छातीवर तलवार चालवून त्याला रक्तबंबाळ केले आहे.

Updated: Sep 15, 2020, 12:23 PM IST
मोदीजी, ही शेतकऱ्यांशी बेईमानी नाही तर काय, बच्चू कडुंचा सवाल title=

अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती: केंद्र सरकारने काही महिन्यांपूर्वी उठवलेली कांद्यावरील निर्यातबंदी आता पुन्हा लागू केली आहे. त्यामुळे लाखो कांदा उत्पादक शेतकऱ्यांना याचा फटका बसणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे.

कांद्याच्या निर्यातबंदीचे काही कारण नव्हते. कांदा हा जीवनावश्यक वस्तूंमधून काढला होता. कांदा नाही खाल्ला तर कुणी मरत नाही. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा विचार करायला पाहिजे होता. मात्र, मोदी सरकारने पुन्हा शेतकऱ्याच्या छातीवर तलवार चालवून त्याला रक्तबंबाळ केल्याचे बच्चू कडू यांनी म्हटले.

कांदा निर्यातबंदीच्या निर्णयानंतर शरद पवार सक्रिय; केंद्राला दिला 'हा' सल्ला

तसेच कांदा प्रश्नावर दिल्लीत जाऊन छुप्या पध्दतीने आंदोलन करणार असल्याचा इशाराही राज्यमंत्री बच्चू यांनी केंद्र सरकारला दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नेहमी नाशिकच्या सभेत म्हणायचे मी कांदा उत्पादक शेतकऱ्यांसोबत बेईमानी करणार नाही. मग ही बेईमानी नाही तर काय आहे, असा सवाल बच्चू कडू यांनी मोदींना विचारला. 

केंद्र सरकारकडून कांदा निर्यातबंदी, कांद्याचे भाव कोसळले

केंद्र सरकारच्या कांदा निर्यातबंदीमुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसणार आहे. यावर्षी ऐन उन्हाळ्यात कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने शेतकऱ्यांनी आपला कांदा कवडीमोल भावात विकला होता. आता कांद्याचे दर वाढत असतानाच केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा मोठा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसणार असल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले.

महाराष्ट्रातून कांदा निर्यातबंदीच्या निर्णयाला मोठ्याप्रमाणात विरोध होण्याची शक्यता आहे. आजच नाशिकच्या लासलगाव बाजारपेठेत व्यापाऱ्यांकडून निदर्शने करण्यात आली. कांदा निर्यातबंदी हा शेतकऱ्यांशी केलेला विश्वासघात असल्याची प्रतिक्रिया किसान सभेचे सरचिटणीस अजित नवले यांनी व्यक्त केली. त्यामुळे आता राज्यातील शेतकरी संघटना आक्रमक होण्याची चिन्हे आहेत.