इमारत दुर्घटना : अखेर सरकारला जाग!

कोसळणाऱ्या इमारतींसाठी इमारतीच्या आर्किटेक्ट आणि इंजिनिअरलाही जबाबदार धरलं जाणार असून त्यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेत.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jul 4, 2013, 02:07 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
कोसळणाऱ्या इमारतींसाठी इमारतीच्या आर्किटेक्ट आणि इंजिनिअरलाही जबाबदार धरलं जाणार असून त्यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेत. मुंबईत भिवंडीला जमीनदोस्त झाल्यानंतर आज सरकारला खडबडून जाग आलीय. मुंबईतील इमारत कोसळण्याची ही पाचवी घटना आहे.
गेल्या २ महिन्यात इमारत कोसळण्याची ही पाचवी घटना आहे. मुंबईत २ तर ठाणे जिल्ह्यात ३ इमारती कोसळल्या आहेत. हे प्रकरण सरकारनं आता गांभीर्याने घेतलंय. ४ एप्रिल रोजी शिळफाट्याच्या ‘लकी कंपाऊंड’मध्ये कोसळलेल्या इमारतीनंतर दोन महिन्यात कोसळलेली ही पाचवी इमारत आहे.
 ४ एप्रिलला शिळफाट्याच्या ‘लकी कंपाउंड’मध्ये कोसळलेल्या इमारतीत ७४ बळी गेले.
 त्यानंतर १० जूनला माहिमची अल्ताफ मेन्शन कोसळली. त्यात १० जणांचा मृत्यू झाला.
 २१ जूनला मुंब्रात इमारत कोसळली त्यात १० जणांचा मृत्यू झाला
 तर त्याच्या दुसऱ्या दिवशी २२ जूनला दहिसरमधे पियूश को ऑपरेटीव्ह हाऊसिंग सोसायटी कोसळली त्यात ७ जणांच्या बळी गेला.

भिवंडी इमारत पडल्यामुळे आता ठाणे जिल्ह्यातल्या इमारतींवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. आज भिवंडीत तीन जण मृत्यूमुखी पडलेत. अशा इमारत दुर्घटनांमध्ये एकट्या ठाणे जिल्ह्यात ८७ जण मृत्यूमुखी पडलेत. ठाणे जिल्ह्यात हे अपघात का होत आहे? ठाणे जिल्ह्यात अनधिकृत इमारतींचं पेव का फुटतंय? प्रशासन डोळेझाक का करतंय? असे अनेक प्रश्न त्यानिमित्तानं पुढे आलेत.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.