खाद्यपदार्थांमध्ये सापडलं झुरळ, एअर इंडियाकडून जाहीर माफी

विमानात खाद्यपदार्थ मागवताय? 

Updated: Feb 5, 2019, 11:19 AM IST
खाद्यपदार्थांमध्ये सापडलं झुरळ, एअर इंडियाकडून जाहीर माफी title=

मुंबई : एअर इंडियाचा महाराजा सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे ते म्हणजे जाहीर माफी मागण्याच्या निर्णयामुळे. भोपाळ- मुंबई विमान प्रवासादरम्यान, एका प्रवाशाला खाण्याच्या पदार्थामध्ये झुरळ सापडल्यामुळे एअर इंडियाकडून माफी मागण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच एका प्रवाशाने विमान प्रवासादरम्यान आपल्याला आलेल्या या वाईट अनुभवाबद्दल सोशल मीडिया पोस्ट करत सर्वांचं लक्ष वेधलं होतं. ज्याची दखल संबंधित विमानसेवा पुरवणाऱ्या एअर इंडियाकडून घेण्यात आली आहे. 

'भोपाळ- मुंबई विमान प्रवासादरम्यान प्रवाशांना आलेल्या वाईट अनुभवाबद्दल आम्ही क्षमस्व आहोत. प्रवाशांना प्रवासाचा आनंद मिळावा हाच आमचा सर्वतोपरी हेतू असतो', असं एअर इंडियाकडून करण्यात आलेल्या ट्विटमध्ये म्हटलं गेलं आहे. ज्यानंतर सोशल मीडियावर अनेक चर्चांना उधाण आलं. 

'एनडीटीव्ही'च्या वृत्तानुसार रोहित राज सिंह चौहान या प्रवाशाने शनिवारी भोपाळहून मुंबईच्या दिसेने येण्यासाठीचा विमान प्रवास केला. ज्यामध्ये त्याने विमानात मिळणारे खाद्यपदार्थ मागवले. ज्यातील इडली- वडा- सांभारच्या मिलमध्ये झुरळ सापडलं. हा सारा प्रकार त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांसमोर ठेवला. विविध विषयांना निकालात काढणाऱ्या याच सोशल मीडियावर अवघ्या काही वेळामध्येच इतरही नेचकऱ्यांनी प्रवासादरम्यानच्या वाईट अनुभवाचं कथन करण्यास सुरुवात केली. 

एकिकडे नेटकऱ्यांचा वाढता संताप पाहता एअर इंडियाकडून सदर प्रकरणी संबंधित खाद्यपदार्थांचा पुरवठा करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करण्याची पावलं उचलण्यात आली तर दुसरीकडे प्रवाशांची गैरसोय आणखी किती दिवस होणार हा मुद्दा उचलून धरला गेल्याचं पाहायला मिळालं. वेळप्रसंगी तिकीटांचे वाढणारे दर आणि त्या दरांच्या तुलनेत मिळणारे हे असे वाईट अनुभव पाहता प्रवाशांचा रोषच एअर इंडियाने ओढवला आहे, असं म्हणावं लागेल.