विधानसभा लढवण्यासाठी शरद पवारांकडे इच्छुकांची रांग, अजित पवारांचं टेन्शन वाढणार?

Assemble Election: राष्ट्रवादी फुटीनंतर पक्ष सोडून न जाता शरद पवारांसोबत राहणाऱ्यांना तिकीट मिळणार की पक्षात पुन्हा घरवापसी करणाऱ्यांना संधी मिळणार?

Updated: Oct 6, 2024, 07:16 PM IST
विधानसभा लढवण्यासाठी शरद पवारांकडे इच्छुकांची रांग, अजित पवारांचं टेन्शन वाढणार? title=
अजित पवारांचं टेन्शन वाढणार

निलेश खरमरे, झी 24 तास पुणे: विधानसभा निवडणूक तोंडावर आल्यानं शरद पवारांच्या पुण्यातील निवासस्थानी राजकीय हालचालींना वेग आलाय. विधानसभा लढवण्यासाठी शरद पवारांकडे इच्छुकांची रांग लागलीय. राष्ट्रवादी फुटीनंतर पक्ष सोडून न जाता शरद पवारांसोबत राहणाऱ्यांना तिकीट मिळणार की पक्षात पुन्हा घरवापसी करणाऱ्यांना संधी मिळणार? यावरुन येणाऱ्या काळात काय राजकीय नाट्य घडणार? यामुळे अजित पवार गटाचं टेन्शन कसं वाढणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 

मोदीबागेसमोरील प्रचंड गर्दी 

पुण्यात शरद पवारांच्या मोदीबागेसमोरील प्रचंड गर्दी पाहायला मिळतेय. या गर्दीला जत्रेचं स्वरूप आलंय विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांच्या आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या रांगाच पवारांच्या घरासमोर लागल्यात. महाराष्ट्रात फक्त पवारांचांच  पक्ष निवडणूक लढवतो की काय हे सांगणारी ही गर्दी आहे. आयारामांची संख्या पाहून फक्त निष्ठावंतानाच उमेदवारी देण्याचं साकडं सामान्य कार्यकर्ते पवारांना घालत आहेत.  

अनेक इच्छुक उमेदवार हे अजित पवारांच्या पक्षातील

सामान्य कार्यकर्त्यांप्रमाणेच पवारांच्या घरी अनेक मोठे नेते तिकीटासाठी भेटतायेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मुलगा सलील देशमुख यांनीही शरद पवारांची भेट घेतलीय. तसेच संदीप क्षीरसागर हेही शरद पवारांच्या भेटीला आले होते.  लोकसभेत मविआला चांगलं यश मिळालंय.  शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं 80 टक्के  स्ट्राईक रेटसह  दहा पैकी आठ जागा जिंकल्यात. लोकसभेप्रमाणेच विधानसभेतही शरद पवारांचा करिष्मा चालणार असल्यानं अनेक इच्छुक उमेदवार शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करण्यासाठी इच्छुक आहेत. विशेष म्हणजे अनेक इच्छुक उमेदवार हे अजित पवारांच्या पक्षातील असल्यानं अजित पवारांचं टेन्शन वाढणार आहे.

धक्क्यातून बच्चू कडू कसे सावरणार?

विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू झालीये. सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीच्या मैदानात उडी मारलीये. शेतकरी आणि दिव्यांगांच्या प्रश्नी आक्रमक असलेले प्रहारचे नेते बच्चू कडू यांना ऐन निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का बसलाय..विधानसभेसाठी बच्चू कडूंच्या पुढाकारानं राज्यभरात तिसरी आघाडी निर्माण करण्यात आलीये.. मात्र, त्यांच्या प्रहार पक्षात बिघाडी झाल्याचं चित्र आहे..आपला भिडू बच्चू कडू अशी अमरावतीत बच्चूभाऊंची ओळख... पण याच बच्चूभाऊंचा भिडू पळालाय. मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी बच्चू कडूंची साथ सोडलीय. महाराष्ट्रात सत्तापालट करण्याच्या मोहिमेवर निघालेल्या बच्चूभाऊंना त्यांच्याच साथीदारानं चकवा दिलाय. राजकुमार पटोलेंनी बच्चू कडूंच्या प्रहारची साथ सोडलीये. प्रहारची बॅट टाकून लवकरच ते शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेणार आहेत.विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांनी महायुतीमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. तिस-या आघाडीसाठी पुढाकार घेतला, पण त्याआधीचं एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं बच्चू कडूंच्या एकमेव साथीदाराला पळवलं.. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर बच्चू कडूंना आपल्याचं जिल्ह्यात मोठा धक्का बसलाय.. या धक्क्यातून कडू कसे सावरतात हे निवडणुकीनंतरच पाहायला मिळणार आहे.