राज ठाकरेंचा ठाणे पोलीस आयुक्तांवर हल्ल्लाबोल

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यातील जाहीर सभेमध्ये ठाणे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.

Updated: Nov 18, 2017, 08:33 PM IST
राज ठाकरेंचा ठाणे पोलीस आयुक्तांवर हल्ल्लाबोल title=

ठाणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यातील जाहीर सभेमध्ये ठाणे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.

मनसेतर्फे फेरीवाल्यांविरोधात सुरु केलेल्या आंदोलनानंतर ठाण्यातील मनसे कार्यकर्त्यांनीही स्टेशन परीसरात आंदोलन केलं. ठाणे स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांच्या सामानाची तोडफोड केली. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या कारवाईत ठाणे मनसे अध्यक्ष अविनाश जाधव यांना अटक करण्यात आली. तसेच त्यांच्या जामिनासाठी तब्बल १ कोटींची हमी मागण्यात आली होती.

या प्रकरणी राज ठाकरे यांनी ठाणे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे.

राज ठाकरे यांनी म्हटलं की, अविनाश जाधव यांच्या जामिनासाठी १ कोटी मागितल्या प्रकरणी ठाणे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना विचारलं असता "मी ठरवेन किती जामीन मागायचा ते".

राज ठाकरे यांनी पुढं म्हटलं की, ठाणे पोलीस आयुक्त परमवीर सिंगांना मी सांगतो हिम्मत असेल तर आया बहिणींवर हल्ला करणाऱ्या फेरीवाल्यांना अटक करून दाखवा, त्यांच्याकडे कोटीचे जामीन मागून दाखवा.

राज ठाकरेंच्या सभेतील महत्वाचे मुद्दे:

  • १८ तारखेच्या सभेच्या वेळेला वीज, केबल बंद केल्या जातील असं म्हटलं होतं, नेमकं तसंच नाशिकमध्ये घडलं
  • सरकारला सभेची भीती वाटते यातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद दिसून येते
  • २०१४ ला आपण महाराष्ट्राची ब्लू प्रिंट दाखवून मनसेने निवडणूक लढवली
  • गुजरातमध्ये भाजप ब्लू प्रिंट काढून निवडणूक लढवतंय
  • सीडी लॉन्च करून निवडणूका लढवणं असे उद्योग केवळ आंबट शौकीनच करू शकतात
  • कारवाई करायचीच तर, जे फेरीवाले रेल्वे स्टेशनवर महिलांची छेड काढतात त्यांच्यावर कारवाई करून दाखवा
  • मराठी पाट्यांच आंदोलन मला पुन्हा हातात घ्यावं लागेल असं दिसतंय कारण अजून काही लोकांना हे समजत नाहीये
  • फेरीवाल्यांना हटवणे हे आमचं काम नाही, ते सरकारचं काम आहे पण ते सरकारला जमलं नाही म्हणून आम्ही केलं
  • आज जी स्टेशन्स दिसत आहेत ती माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी करून दाखवलं
  • अविनाश जाधवच्या जामिनासाठी १ कोटी मागितले. कशाचे एक कोटी मागताय? त्यावर ठाण्याचे पोलीस आयुक्त म्हणतात की मी ठरवेन किती जामीन मागायचा ते
  • कमिशनर परमवीर सिंगांना मी सांगतो हिम्मत असेल तर आया बहिणींवर हल्ला करणाऱ्या फेरीवाल्यांना अटक करून दाखवा, त्यांच्याकडे कोटीचे जामीन मागून दाखवा
  • आझाद मैदानात रझा अकादमीच्या मोर्च्याच्या वेळी पोलीस भगिनींवर त्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला, त्यांची छेड काढली, त्यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेच मोर्चा काढला होता
  • माझ्या हातात ना राज्य सरकार नाही ना केंद्रात माझा प्रतिनिधी नाही, पण वैद्यकीय प्रवेश परीक्षेसाठी नीट परीक्षा लादली जात होती, त्यावेळेला पालक माझ्याकडे आले, हे का होतं तर महाराष्ट्र सैनिकांमुळे होतं
  • कित्येक वर्ष गुजराती या शहरांत गुण्यगविंदाने राहत होते, तेंव्हा कधी नाही मांसाहाराचा वास येत नव्हता. भाजपचे सरकार आल्यापासून या सगळ्या गोष्टी कश्या सुरु झाल्या?
  • जैन मुनीम फतवे कसे काढतात पर्युषण काळात मांस बंदी करा म्हणून? तुम्ही जर आरे केलंत तर आमच्याकडून कारे होणारचं
  • बुलेट ट्रेनला माझा विरोध आहे कारण त्यांचे हेतू स्वच्छ दिसत नाहीयेत
  • मोदी पंतप्रधान झाल्यावर मी म्हटलं होतं की आता गुजरातचा नाही देशाचा विचार करा
  • बुलेट ट्रेन सुरु करताना अहमदाबादचा विचार कसा येतो?
  • जर मोदींना गुजरातच प्रेम वाटू शकतं तर राज ठाकरेला महाराष्ट्राचं प्रेम का वाटू नये?