'त्या' गोष्टीची खंत वाटली! इरसालवाडीत दिवसभर थांबलेल्या मुख्यमंत्र्यांनी सांगितला मन हेलावणारा अनुभव

इरसालवाडीत आज सलग दुसऱ्या दिवशी बचावकार्य सुरु आहे. या दुर्घटनेत मृतांचा आकडा आता वीसवर गेली आहे. घटनेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत निवेदन दिलं. यावेळी राज्यातील दरड प्रवण क्षेत्रातील कुटुंबांचं स्थलांतर करुन कायमस्वरुपी पुनर्वसन करण्याचा घोषणा मुख्यमंत्र्यानी केली.

राजीव कासले | Updated: Jul 21, 2023, 07:12 PM IST
'त्या' गोष्टीची खंत वाटली! इरसालवाडीत दिवसभर थांबलेल्या मुख्यमंत्र्यांनी सांगितला मन हेलावणारा अनुभव title=

मुंबई : राज्यातील दरड प्रवण क्षेत्रातील नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतर करून त्यांचं कायमस्वरुपी पुनर्वसन (Rehabilitation) करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Ekanth Shinde) यांनी आज विधानसभेत निवेदनाद्वारे दिली. रायगड जिल्ह्यातील इरशाळवाडी दुर्घटनेबाबत (Irshalwadi Landslide) आज झालेल्या मंत्रिमडळाच्या बैठकीत  (Cabinet Meeting) चर्चा झाली. त्यावेळी ज्या ठिकाणी धोका आहे अशा दरड प्रवण क्षेत्रातील नागरिकांना तातडीने सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे निर्देश देण्यात आले आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. काल दिवसभर दुर्घटनास्थळी असलेले मुख्यमंत्री शिंदे यांनी तिथला अनुभव सांगितला. त्याभागातील परिस्थिती किती बिकट आणि धोकायदायक होती याची माहिती दिली. इरशाळवाडी इथं दरड कोसळल्याने घरे मातीच्या ढिगाऱ्याखाली गेली. त्यामध्ये 20 जणांचा मृत्यू झाला तर आठ जण जखमी झाले आहेत. मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत राज्य शासनाने जाहीर केले असल्याचे त्यांनी सांगितलं. आज सकाळपासून इरसालवाडी इथं शोध कार्यास सुरूवात झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.  

दुर्घटनेची माहिती मिळताच प्रशासकीय यंत्रणेमार्फत सर्व बचाव पथकांना तात्काळ पाचारण करण्यात आले. माहिती मिळताच मंत्रिमंडळातील सहकारी मंत्री गिरीष महाजन, दादा भुसे, उदय सामंत हे रात्रीच दुर्घटनास्थळाकडे रवाना झाले. मंत्री आदिती तटकरे, अनिल पाटील, आमदार महेश बालदी, प्रशांत ठाकुर यांच्यासह जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी त्याठिकाणी धाव घेतली. यंत्रणांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी मी पायी चालत डोंगरावर जाण्याचा निर्णय घेतला. तेथील दृष्य विदारक होते, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

एवढ्या उंचावर साहित्य, साधनासामुग्री घेऊन जाणाऱ्या बचाव पथकातील कर्मचाऱ्यांना सलाम करतो, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी दुर्घटनाग्रस्तांच्या पाठीशी शासन खंबीर असल्याची ग्वाही दिली. मात्र यंत्रणा, साधने असुनही प्रतिकुल परिस्थितीमुळे तिचा वापर करू शकलो नाही याची खंत मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली. बचाव कार्यास यशवंती हाइकर्स स्वयंसेवी संस्थेचे 25 स्वयंसेवक 30 चौक ग्रामस्थ, 20 वरोसे ग्रामस्थ, नगरपालिका खोपोलीतील 25 कर्मचारी, चौक ग्रामपंचायतमधील 15 कर्मचारी, निसर्ग ग्रुप पनवेलमधील 15 स्वयंसेवक तसंच कोलाड रिव्हर राफटर्स इत्यादींचा सहभाग आहे.  याशिवाय NDRF च्या 4 टिमचे  100 जवान TDRF चे 80 जवान स्थानिक बचाव पथकाच्या 5 टिम यांनी बचाव कार्याच्या कामात मोलाची कामगिरी बजावत आहेत असं मुख्यमंत्र्यांनी सांगतिलं.

इरशाळ गडाच्या पायथ्याशी वैद्यकीय पथके, रुग्णवाहिकेसह आवश्यक अशा वैद्यकीय सुविधा व इतर साहित्य तात्काळ उपलब्ध करण्यात आले. बचाव करण्यांत आलेल्या नागरिकांच्या तात्पुरत्या पुनर्वसनासाठी आवश्यक सोयी-सुविधा युक्त कंटेनर्स आणि इतर मुलभूत सोयी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. शोध व बचाव कार्यासाठी आवश्यक साहित्य तातडीने बेस कॅम्प येथे उपलब्ध करून देण्यांत आले आहे. त्यासाठी समन्वय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. दुर्घटनाग्रस्त नागरिकांच्या तात्पुरत्या निवास व्यवस्थेसाठी 60 कंटेनर मागविण्यात आले आहेत. सिडकोच्या माध्यमातून या नागरिकांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. 

स्थानिक माहितीवरून त्या आदिवासी वाडीमध्ये एकूण 48 कुटुंब वास्तव्यास असून लोकसंख्या 228 इतकी आहे. त्यातील सुमारे 17 ते 18 घरांवर दरड कोसळी आहे. बचाव कार्यात 98 व्यक्तींना सुरक्षित वाचविण्यास यश आलं आहे. 228 पैकी उर्वरित 109 व्यक्तींचा शोध घेण्याचं काम सुरु आहे. इरसालवाडी हे ठिकाण भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण (GSI) विभागाच्या अहवालानुसार संभाव्य दरडग्रस्त ठिकाणाच्या यादीत समाविष्ट करण्यात आलेले नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.