आला आला वारा... संगे पावसाच्या धारा...

गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने हैराण असलेल्या मुंबई आणि ठाणेकरांना मान्सूनपूर्व पावसाने रविवारच्या मुहूर्तावर दिलासा दिला.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jun 2, 2013, 10:08 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने हैराण असलेल्या मुंबई आणि ठाणेकरांना मान्सूनपूर्व पावसाने रविवारच्या मुहूर्तावर दिलासा दिला. रविवारी संध्याकाळी मुंबईत काही भागात पावसाच्या तुरळक सरी आल्या तर ठाणे आणि नवी मुंबईच्या विविध भागात विजेचा लखलखाट व सोसाट्याच्या वा-यासह पावसानं हजेरी लावली.
मुंबईत बोरिवली ते अंधेरीदरम्यान पावसाच्या तुरळक सरी पडल्या. तर ठाणे, कल्याण, डोंबिवली, आसनगाव, अंबरनाथ व बदलापूर अशा सर्वच भागात पावसाच्या रिमझिम सरी बरसल्या. गेल्या काही दिवसांपासून वाढलेला उष्मा या सरींनी पळवून लावला. रविवारचा दिवस कारणी लावण्यासाठी खरेदी व फिरण्यासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची या पावसामुळे काहीशी तारांबळ उडाली. पण बहुतेकांनी हलक्या सरी झेलत पहिल्या पावसाचं स्वागत केलं. पावसाचं आगमन होताच विजेचा लपंडावही सुरु झाला आणि कळव्याच्या खारेगांव भागातील वीज गुल झाली.
संध्याकाळी ६ वाजता आसनगाव स्टेशनात अप मार्गावर ओव्हरहेड वायर तुटली होती. पण ती तात्काळ दुरुस्त करण्यात आल्यानं लोकल वाहतुकीवर विशेष फरक जाणवला नाही.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.