मुंबईत खोट्या प्रतिष्ठेपायी तरुणानं गमावला जीव

खोट्या प्रतिष्ठेपायी हत्या होण्याचा प्रकार भारताच्या आर्थिक राजधानीत म्हणजेच मुंबईत घडलाय. कुर्ला रेल्वे पोलिसांच्या हद्दीत हा प्रकार घडल्याचं उघडकीस आलंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jun 18, 2014, 04:29 PM IST

www.24taas.com, वृत्तसंस्था, मुंबई
खोट्या प्रतिष्ठेपायी हत्या होण्याचा प्रकार भारताच्या आर्थिक राजधानीत म्हणजेच मुंबईत घडलाय. कुर्ला रेल्वे पोलिसांच्या हद्दीत हा प्रकार घडल्याचं उघडकीस आलंय.
उत्तर प्रदेशमधील जौनपूर जिल्हयातील गोणोली गावात राहणारा अभिषेक विजय यादव या तरुणाचे त्याच गावात राहणाऱ्या एका १८ वर्षीय तरुणीवर प्रेम होते. त्यांच्या कुटुंबीयांना हे मान्य नव्हतं.
अभिषेक यादव आपल्या प्रेयसीला घेऊन मुंबईच्या दिशेनं रवाना झाला. हे मुलीच्या वडिलांना कळालं आणि त्यांनी कुर्ला टर्मिनसवरुनच दोघांचं अपहरण केलं. यावेळी अभिषेकबरोबर त्याचा एक मित्रही हजर होता. त्यानं हा सर्व प्रकार अभिषेकच्या वडिलांना सांगितला. त्यानंतर अभिषेकच्या वडिलांनी विजय बहाद्दूर यादव यांनी कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्यात मुलाच्या अपहरणाची तक्रार नोंदवली.
त्यानंतर, अभिषेकचा पत्ता लागला. पण, यावेळी अभिषेक जिवंत नव्हता. अभिषेकचा मृतदेह वसईतील वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीत जंगलात रविवारी सापडला होता. अभिषेकच्या कपड्यावरुन त्याची ओळख पटली. अभिषेकची ओळख पटू नये या करता त्याचा चेहरा दगडाने ठेचण्यात आला होता.
मात्र, अभिषेकची हत्या झाल्याचे उघडकिस होताच कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्यात मुलीचे वडील गुलाब यादव, काका सुभाष यादव आणि त्यांचा एक नोकर या तिघांविरुध्द हत्येचा गुन्हा दाखल करुन त्यांच्या अटकेची प्रक्रिया सुरु करण्यात आलीय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.