दलित अत्याचाराच्या प्रश्नावर आठवलेंचं आंदोलन

रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी दलितांवर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध आवाज उठवण्यासाठी ९ मे रोजी राज्यभर आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. अहमदनगर जिल्ह्य़ातील नितीन आगे या तरुणाची हत्या करण्यात आली.

Updated: May 4, 2014, 07:24 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी दलितांवर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध आवाज उठवण्यासाठी ९ मे रोजी राज्यभर आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. अहमदनगर जिल्ह्य़ातील नितीन आगे या तरुणाची हत्या करण्यात आली. या हत्येमुळे आणि दलितांवरील वाढलेल्या अत्याचारांच्या घटनांमुळे संपुर्ण दलित सामाजात एक संतापाची लाट आहे. या संतापाला वाट मोकळी करून देण्यासाठी आठवले राज्यभर आंदोलन करणार आहेत. एमआयजी क्लबमध्ये बोलताना आठवले यांनी ही माहिती दिली.
अहमदनगर मधील नितीन आगे या तरूणांच्या हत्येचं प्रकरण सध्या राज्यात जोर पकडून आहे. यातच नगर जिल्ह्य़ात दलित अत्याचाराच्या गेल्या काही वर्षांत ११२ घटना घडल्याचं समोर आलं आहे. या कारणाने हा जिल्हा दलित अत्याचारग्रस्त जिल्हा जाहीर करण्याची मागणी आठवले यांनी केली़ आहे.
दलित अत्याचारांच्या प्रश्नांवर राज्य सरकार नेहमीच दुर्लक्ष करत आलंय. सरकारच्या नाकर्तेपणामुळे दलितांना संरक्षण मिळत नाही, असा आरोप आठवले यांनी केला़. अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टची अंमलबजावणी सरकार योग्यरितीने करत नाही. याच कारणाने सोनई हत्याकांडातील पीडितांना देखील अजूनपर्यंत न्याय मिळाला नाही, असा आरोप आठवले यांनी सरकारवर केला आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.