कोणा एका व्यक्तीची किंमत 20 रुपये; Sex Worker च्या आयुष्यातील धक्कादायक वास्तव पाहून भन्साळी भावूक

कोणाच्याही नशिबी हे असं दु:ख नको... 

Updated: Mar 3, 2022, 06:13 PM IST
कोणा एका व्यक्तीची किंमत 20 रुपये; Sex Worker च्या आयुष्यातील धक्कादायक वास्तव पाहून भन्साळी भावूक  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : संजय लीला भन्साळी हे बॉलिवूडमधील एक असं नाव आहे, ज्या नावासोबत बराच अनुभवही सोबत येतो. चित्रपटांचे भव्य सेट, जणूकाही एखादं चित्र, असं भासवणारे त्यांचे कलाकार आणि कथानकं हे सारंकाही कायम प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारं. (gangubai kathiawadi) 

म्हणूनच की काय, भन्साळींच्या चित्रपटात भूमिका साकारण्यासाठी कलाकारच नव्हे तर त्यांचे चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकही बरेच उत्सुक असतात. (Sanjay Leela Bhansali Alia bhatt)

सध्या त्यांचा असाच एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा चित्रपट म्हणजे, आलिया भट्टची मध्यवर्ती भूमिका असणारा 'गंगुबाई काठियावाडी'. 

कमाठीपुऱ्यामधील महिलांच्या आयुष्यावर प्रकाशझोत टाकत तेथील वास्तव प्रेक्षकांपर्यंत आणण्याचा प्रयत्न त्यांनी यातून केला. आलियानं भन्साळींचा विश्वास सार्थ ठरवत कथानकाला साजेसा अभिनय केला. 

हा चित्रपट खुदद् भन्साळी यांना अतिशय जवळचा. एका मुलाखतीत त्यांनी अतिशय भावनिक स्वरात त्याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या. 

'तुम्ही लहान मुलाच्या रुपात जे पाहता त्यासाठी संवेदनशील होता. कोणा एका व्यक्तीची किंमत 20 रुपये कशी असू शकते? माझ्या मनात हाच मुद्दा राहिला. 

आपण स्वत:मध्येच अतिशय मौल्यवान आहोत. आपल्यावर कोणी बोली लावू शकत नाही. आपल्याला 5 रुपये, 20 रुपये किंवा 50 रुपयांमध्ये विकलं जाऊच शकत नाही, हे अमानवी आहे', असं म्हणताना त्यांना हुंदका दाटून आला.

यावेळी त्यांनी एक सुरेख दृष्टीकोन मांडला. 'जर, तुम्ही एखाद्या शाळेत जाणाऱ्या मुलाच्या नजरेतून त्यांच्याकडे (देह व्यापार करणाऱ्या महिलांकडे) पाहता तर, त्यांच्या चेहऱ्यांवरच्या अनेक गोष्टी तुम्हाला लक्षात येतील. 

त्या स्वत:ला अशा पद्धतीनं सजवतात, भरमसाट रंग आणि पावडर लावतात की त्यांच्या जीवनात असणारी दु:खच इतरांना दिसत नाहीत.

साधी लिपस्टीक लावतानाही त्यांच्या मनात चीड असते. पण, ते आपण सहसा पाहू शकत नाही. त्यांना हे जमतं, पण ते आपण करु शकत नाही.

कोणी मोठा मेकअप आर्टीस्टही हे करुच शकत नाही, माझ्यासाठी हे सर्वकाही एक दिग्दर्शक म्हणून चित्रपटाच्या दृष्टीनं साकारलं जाणं अतिशय महतत्वाचं ठरतं', असं ते आग्रहाने म्हणाले. 

एका मुलाखतीमध्ये कमाठीपुऱ्याच्या गल्लीतूनच आपण शालेय दिवसांमध्ये ये-जा करत असताना बसमधूनही ती दृश्य, तो परिसर दिसत असल्याची आठवण त्यांनी रंगवली. 

त्या भागातील आक्रोश, त्या महिलांचे आवाज हे सर्वकाही आपल्या कानात आजही घुमत असल्याचं म्हणत गंगुबाई साकारण्यासाठीची उत्कटता भन्साळी यांनी मांडली. 

समाजातील दुर्लक्षित वर्गाच्या जगण्याला प्रकाशझोतात आणत भन्साळींनी समाजाला एक नवा संदेश दिला. आता गरज आहे ती म्हणजे तुम्ही-आम्ही समाजातील याच घचकांकडे चांगल्या दृष्टीकोनातून पाहण्याची, कोणतेही पूर्वग्रह नं बांधण्याची.