'प्रमाणापेक्षा जास्त मीठ खाल तर जीवाला मुकाल, मीठ खाण्याचे 'हे' आहेत दुष्परिणाम

Salt Side Effect : मीठ हा आपल्या जिवनाचा अविभाज्य भाग आहे. मीठाशिवाय अन्नाला चव नाही. मात्र हेच मीठ आता भारतीयांच्या जिवावर उठलंय. WHOनं याबाबत एक धक्कादायक अहवाल प्रसिद्ध केलाय. या अहवालात तब्बल 18 कोटी 80 लाख भारतीयांना हार्ट अटॅकचा धोका असल्याचं म्हंटलंय. 

राजीव कासले | Updated: Sep 23, 2023, 09:03 PM IST
'प्रमाणापेक्षा जास्त मीठ खाल तर जीवाला मुकाल, मीठ खाण्याचे 'हे' आहेत दुष्परिणाम title=

Salt Side Effect : शाकाहारी असो वा मांसाहारी. जेवणात मीठ  (Salt) नसेल तर ते अगदी बेचव लागतं. त्यामुळे अन्नपदार्थांमध्ये मीठ असायलाच हवं. मात्र हेच मीठ तुमचा घात करू शकतं. कारण WHO अर्थात जागतिक आरोग्य संघटनेनं याबाबत एक धक्कादायक अहवाल दिलाय. या अहवालानुसार भारतात तब्बल 18 कोटी 80 लाख लोकांना हार्ट अटॅकचा (Heart Attack) धोका असल्याचं समोर आलंय.  

WHOच्या आकडेवारीनुसार 1990च्या सुमारास जगभरात 65 कोटी लोक रक्तदाबाचे रूग्ण होते. 2019 मध्ये ही संख्या जवळपास 130 कोटी इतकी झाली. यातील 1 कोटी 80 लाख लोकांचा उच्च रक्तदाबामुळे मृत्यू झाल्यानं WHOनं म्हंटलंय. 2019च्या आकडेवारीनुसार भारतात हाय ब्लड प्रेशरच्या रूग्णांची संख्या 18 कोटी 80 लाख होती आहे. यातील केवळ 15 टक्के रूग्ण असे आहेत ज्यांचा रक्तदाब नियंत्रणात आहे. WHOच्या अहवालानुसार भारतीयांचा ब्लड प्रेशर वाढण्यासाठी अनेक कारणं आहेत. त्यापैकी एक प्रमुख कारण आहे ते म्हणजे मीठाचं अतिरिक्त सेवन. भारतीय गरजेपेक्षा जास्त मीठ खात असल्यानं त्यांना रक्तदाबाच्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे. 

भारतात 25 वर्षांवरील व्यक्ती दिवसाला सरासरी 10 ग्रॅम मीठाचं सेवन करते. WHOच्या म्हणण्यानुसार आहारात मीठाचं प्रमाण केवळ 5 ग्रॅमच असायला हवं. याचाच अर्थ भारतीय आवश्यकतेपेक्षा दुप्पट मीठाचं सेवन करतायेत. याशिवाय तंबाखू, दारूचं सेवन, जंक फूड, बदलती जीवनशैली ही देखील रक्तदाब वाढीची कारणं आहेत. मीठामध्ये सोडिअम असते, जे आपल्या शरीराला आवश्यक असतं. मात्र त्याचं अधिक सेवन हृदयासाठी घातक ठरु शकतं. मिठातले सोडिअम शरीरातील पाणी शोषून घेतं. त्यामुळे आहारात मीठ जास्त असेल तर डी-हायड्रेशनचा त्रास होऊ शकतो. 

म्हणूनच उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्यांना मीठ कमी खाण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे सुखी जिवनाची चव घालवायची नसेल तर मीठ जरा कमीच खा...नाही तर तुम्हाला हार्ट अटॅक येऊ शकतो.