Bihar Election : पहिल्या टप्प्यात ५३.५४ टक्के मतदान

बिहार निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ७१ जागांसाठी पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाले

Updated: Oct 29, 2020, 07:20 AM IST
Bihar Election : पहिल्या टप्प्यात ५३.५४ टक्के मतदान title=

पाटणा : बिहार निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ७१ जागांसाठी पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाले. एकूण ५३.५४ टक्के मतदान झाले आहे. १६ जिल्ह्यांमध्ये ७१ जागांसाठी मतदानात दिग्गजांचं भवितव्य ईव्हीएमबंद झाले आहे. ६ मंत्र्यांसह १ हजार ६६ उमेदवारांचे भवितव्य यंत्रात बंद झाले आहे. कोरोनाची साथ पसरल्यानंतर होत असलेली ही पहिलीच मोठी निवडणूक असल्यामुळे त्याकडे लक्ष लागले आहे. बिहारमध्ये एकूण ७ कोटी १८ लाख मतदार आहेत. त्यात ३ कोटी ७९ लाख पुरुष मतदार, तर ३ कोटी ३९ लाख महिला मतदार आहेत.

या निवडणुकीत मतदानकेंद्रात मास्कचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंग राखणे बंधनकारक होते. याचे काटेकोरपणे वापर करण्यात आला. प्रत्येक मतदानकेंद्रावर थर्मल स्क्रिनिंग, सॅनिटायझर्स, साबणाची व्यवस्था करण्यात आली होती. सर्वाधिक ४२ ठिकाणी आरजेडी रिंगणात आहे. त्याखालोखाल ३५ ठिकाणी जेडीयू, २९ ठिकाणी भाजप तर २० जागांवर काँग्रेसचे उमेदवार आहेत.  

पहिला टप्प्यातील मतदान शांततेत पार पडल्यानंतर आता दुसरा टप्पा ३ नोव्हेंबर होणार असून तिसरा टप्प्यातील मतदान ७ नोव्हेंबरला होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात ९४ मतदारसंघात तर तिसऱ्या टप्प्यात ७८ मतदारसंघात मतदान होईल. तर १० नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यापासून देशातील अनेक निवडणुका स्थगित करण्यात येत होत्या. त्यामुळे बिहार निवडणूक वेळेत होईल की पुढे ढकलण्यात येईल, अशी शंका होती.