प्रेमविवाहाची शिक्षा! आईने हात तर भावाने पाय पकडले, बापाने मुलीचा गळा आवळला... थरकाप उडवणारं हत्याकांड

आरोपींनी मुलीची हत्या केली त्यानंतर एका सुनसान जागेवर तिचे अंत्यसंस्कारही करुन टाकले. गावातील एका व्यक्तिला संशय आला आणि त्याने याची माहिती मुलीच्या पतीला दिली. पतीने पोलिसांता तक्रार केली त्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात हत्येचा थरार उघडकीस आला. 

राजीव कासले | Updated: Aug 18, 2023, 07:25 PM IST
प्रेमविवाहाची शिक्षा! आईने हात तर भावाने पाय पकडले, बापाने मुलीचा गळा आवळला... थरकाप उडवणारं हत्याकांड title=

Anjali Murder Case : मराठी चित्रपट सैराटमध्ये प्रेमविवाह करणाऱ्या मुलीच्या घरी जाऊन तिचा भाऊ तिची आणि तिच्या पतीची हत्या करतो असं दृश्य दाखवण्यात आलं होतं. प्रत्यक्षात अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. पण यात तरुणीच्या हत्येत भाऊच नाही तर तिच्या आई आणि वडिलांचाही सहभाग होता. मृत तरुणीचा पती आपल्या बहिणीकडे गेला होता. हीच संधी साधत तरुणीचा भाऊ आणि आई-वडिल तिच्या घरी पोहोचले. या तिघांनी मिळून मुलीची हत्या (Murder( केली आणि एका सुनसान जागेत तिच्यावर अंत्यसंस्कारही (Funeral) करून टाकले.

अंगाचा थरकाप उडवणारी ही घटा हरयाणातल्या गुरुग्राममध्ये घडली आहे. गावातील एका व्यक्तीने तरुणीच्या पतीला फोन करुन याबाबतची माहिती दिली. त्यानंतर पतीने सासरच्यांविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. हॉरर किलिंग (Horror Killing) प्रकरणात मुलीचे आई-वडिल आणि भावाला पोलिसांनी अटक केली असून तिघांनीही आपला गुन्हा कबूल केला आहे. 

गुरुवारी म्हणजे 17 ऑगस्टला सकाळी 11 वाजण्याच्या सुमारात हे हत्याकांड घडलं. 22 वर्षांची अंजली गुरुग्राममधल्या सेक्टर 102 मध्ये पती संदीपसह राहात होती. अंजली बीएससीची विद्यार्थिनी आहे. घटनेच्या दिवशी संदीप आपल्या बहिणीच्या घरी गेला होता. त्याचवेळी अंजलीचा भाऊ कुणाल, वडिल कुलदीप आणि आई रिंकी तिच्या घरी आले. काही कळाच्या आतच या तिघांनी अंजलीला मारहाण सुरुवात केली. मारहाणीनंतर आईने अंजलीचे हात तर भावाने तिचे पाय पकडले. त्यानंतर वडिल कुलदीपने निर्दयीपणे अंजलीचा गळा आवळला. यात अंजलीचा जागीच मृत्यू झाला. 

अंजलीची हत्या केल्यानंतर तिघांनी मिळून तिचा मृतदेह आपल्या कारमध्ये ठेवला. त्यानंतर गुरुग्राममधल्या सुरैती गावासाठी ते रवाना झाले. वाटेत एका निर्मणूष्य जागेत अंजलीचा मृतदेह जाळून टाकला. अंजली आणि संदीप राहात असलेल्या गावातील एका व्यक्तीने अंजलीचा मृतदेह कारमध्ये टाकताना पाहिला आणि याची माहिती त्याने अंजलीचा पती संदीपला दिली.  संदीपला ही माहिती मिळताच त्याच्या खालची जमीन सरकली. याबाबतची माहिती त्याने तात्काळ पोलिसांना दिली. हे प्रकरण गांभीर्याने घेत पोलिसांनी अंजलीचे आई-वडिल आणि भावाला अटक केली. चौकशीत अंजलीची हत्या केल्याचं त्यांनी कबूल केलं. 

प्रेमविवाहामुळे नाराज
मृत अंजली आणि संदीप एकाच गावात राहात होते. अंजली जाट कुटुंबातील आहे तर संदीप ब्राम्हण. दोघांचं एकमेकांवर प्रेम होतं. 19 डिसेंबर 2022 मध्ये दोघांनी पळून जाऊन एका मंदिरात लग्न (Love Marriage) केलं. घरच्यांच्या विरोधामुळे  त्यांनी गाव सोडलं आणि गुरग्रामधील सेक्टर 102 मध्ये भाड्याने घर घेतलं. पण अंजलीच्या घरच्यांच्या मनात लग्नाबद्दल प्रचंड संताप होता. पोटच्या मुलीला संपवण्याचा त्यांनी कट आखला. 17 ऑगस्टला अंजलीचा पती रोहतकमध्ये राहाणाऱ्या बहिणीकडे निघाला. याची माहिती अंजलीचा भाऊ कुणालने आपल्या आई-वडिलांना दिली.

आपल्या कारने तिघंही अंजलीच्या घरी पोहोचले आणि तिची हत्या केली. अंजलीचा बाप एका फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये काम करतो. या हॉटेलमधली एक कार त्याने काही तासांसाठी हवी असल्यांच सांगत आणली होती. याच कारमध्ये अंजलीचा मृतदेह टाकण्यात आला होता.