पाहा मंत्र्यांना जनतेची किती काळजी; पूर आढावा बैठकीत मंत्र्यांना लागली डुलकी

पूरपरिस्थितीच्या आढावा बैठकीत मंत्री चक्क झोपले असल्याचा दावा करण्यात आला आहे

Updated: Sep 6, 2022, 09:32 PM IST
पाहा मंत्र्यांना जनतेची किती काळजी; पूर आढावा बैठकीत मंत्र्यांना लागली डुलकी title=

मुसळधार पावसाने कर्नाटकात (karnataka) धुमाकुळ घातला आहे. या पावसामुळे राजधानी बंगळुरूमध्ये (bangalore) पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. बंगळुरूमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने लोकांना ये-जा करण्यासाठी ट्रॅक्टरचा वापर करावा लागत असल्याची स्थिती आहे (karnataka flood situation). मात्र भाजप (bjp) आणि काँग्रेस (congress) अशा परिस्थितीतही एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. 

मुख्यमंत्री बोम्मई यांनी या परिस्थितीसाठी काँग्रेसला जबाबदार धरलं आहे. तर काँग्रेस कर्नाटकने ट्विटर हँडलवर मंत्री आर अशोक यांचा एक फोटो शेअर करून त्यांची खिल्ली उडवली. राज्यात उद्भवलेल्या संकटावर गंभीर बैठक सुरू असताना आर अशोक झोपेचा आनंद घेत होते, असे काँग्रेसचे म्हणणे आहे.

काँग्रेसने शेअर केलेल्या दोन फोटोंमध्ये आर अशोक मुख्यमंत्र्यांच्या शेजारी खुर्चीवर बसलेले आहेत आणि त्यांचे डोळे बंद आहेत. फोटोमध्ये ते झोपले आहेत असे दिसते. मात्र याची पुष्टी झालेली नाही. फोटो शेअर करताना काँग्रेसने कन्नडमध्ये लिहिले की, "बुडणे अनेक प्रकारचे असते. राज्यातील जनता पावसात बुडत आहे आणि मंत्री झोपेत बुडत आहेत." सोमवारी आर अशोक यांनीही या भेटीचे फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत.

दरम्यान, सध्याच्या परिस्थितीला आधीचे काँग्रेस सरकारच जबाबदार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. असा प्रकार गेल्या ९० वर्षांत झालेला नाही, असेही ते म्हणाले. ही समस्या संपूर्ण बंगळुरूची नसून केवळ दोन प्रदेशांची आहे. लहान टाक्या असल्याने पाणी ओसंडून वाहत असल्याचे त्यांनी सांगितले. मागील काँग्रेस सरकारच्या नियोजनशून्य कारभाराचा हा परिणाम आहे. त्यांनी हळूहळू तलाव नष्ट केले, असा आरोप मुख्यमंत्री बोम्मई यांनी केला आहे.

मुख्यमंत्री म्हणाले की, "बंगळुरूमध्ये पाण्याचा निचरा करण्यासाठी 1500 कोटी रुपये आणि अतिक्रमण हटवण्यासाठी 300 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. बेंगळुरू व्यतिरिक्त, हवामान खात्याने कोडागू, दक्षिण कन्नड, उत्तरा कन्नड, उडुपी आणि चिकमंगळूरमध्ये यलो अलर्ट जारी केला आहे. प्रशासनाने एसडीआरएफची टीम बाधित भागात पाठवली आहे. बोटीतून लोकांना सुरक्षित स्थळी नेले जात आहे."