हरिशचंद्र गडावर गेलेल्या पर्यटकाचा मृत्यू नेमका कसा झाला? दोन दिवसानंतर समोर आले सत्य

पावसात ट्रेकिंग करणे पर्यटकाला महागात पडले आहे. हरिश्चंद्र गडावर गेलेल्या पर्यटकाचा थंडीने गारठून मृत्यू झाला आहे.   

Updated: Aug 8, 2023, 11:31 PM IST
हरिशचंद्र गडावर गेलेल्या पर्यटकाचा मृत्यू नेमका कसा झाला? दोन दिवसानंतर समोर आले सत्य title=

सोनू भिडे, झी मीडिया, नाशिक : सध्या पावसाळी पर्यटन सुरु झाले आहे. यानिमित्त अनेक पर्यटन स्थळी पर्यटकांची गर्दी होत आहे.  पावसाळी पर्यटनात अनेक पर्यटक ट्रकिंग करण्यासाठी घरा बाहेर पडत असतात. असाच पर्यटकांचा एक ग्रुप हरिशचंद्र गड येथे गेला होता. मात्र प्रचंड धुके, वारा, पाऊस असल्याने यांची वाट चुकली आणि एका पर्यटकाची थंडी वाजून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दोन दिवसानंतर मृत्यू नेमका कसा झाला हे समोर आले आहे.  

पुण्यातील सहा जणांचा ग्रुप ट्रेकिंगसाठी आला होता

पुणे येथील सहा जणांच्या एका ग्रुपन पावसाळी ट्रकीगला जाण्याचा निर्णय केला. जायचं कुठे हा प्रश्न होता. सर्वानुमते हरिशचंद्र गडावर जाण्याच ठरलं. एक ऑगस्टला अनिल उर्फ बाळू नाथराव गीते (वय 32),अनिल मोहन आंबेकर (वय 33), गोविंद दत्तात्रय आंबेकर (वय 35),तुकाराम आसाराम तिपाले (वय 40), हरिओम विठ्ठल बोरुडे (16) ,महादू जगन भुतेकर (वय 38) हे सर्व तरुण हरिशचंद्र गडावर ट्रेकिंगसाठी निघाले.   

अचानक गडावर मोठ्या प्रमाणात धुक वाढलं

खाजगी वाहनाने पाचनई गावात दुपारी तीन वाजता पोहचले. अंगावर पावसाचे तोडके कपडे घालून सहाही जण गडाच्या मध्यावर पोहचले. यावेळी आपल्या मोबाईल मध्ये फोटो काढत हे तरुण पुढे निघाले. मात्र, अचानक गडावर मोठ्या प्रमाणात धुक वाढलं. त्यामुळे समोर असलेला व्यक्ती सुद्धा कोणाला दिसत नव्हता. यानंतर सहाही तरुण जंगलात वाट मिळेल त्या दिशेने जाऊ लागले. धुक आणि रात्रीचा अंधार असल्याने संपूर्ण रात्र जंगलात गेली. सकाळी पाऊस सुरु झाला आणी काही प्रमाणात धुक कमी झाल. यानंतर मित्रांची शोधाशोध सुरु झाली. तेव्हा जवळच थंडीत कुडकुडून अनिल गीते याचे शरीर कडक झाल्याचे दिसून आले. 

मोबाईलला रेंज नसल्याने संपर्क झाला नाही

मोबाईला रेंज नसल्याने संपर्क करणेसुद्धा कठीण झाले होते. यामुळे हे तरुण जंगलात आणखीनच भरकटत गेले. 
अखेर गाईडच्या मदतीने रात्रीच शोध घेत त्यांच्या पर्यंत पोहचले. यानंतर गावकऱ्यांच्या मदतीने सहाही जणांना गडावरून खाली आणण्यात आले. सर्व तरुणांना राजूर येथील रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले. मात्र अनिल उर्फ बाळू गीते यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले तर इतर तरुणांवर रुग्णालयात करण्यात आले. ग्रामीण रुग्णालयात शव विच्छेदन करून बाळू गीते यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

हरिशचंद्र गड

हरिश्चंद्रगड हा प्राचीन गड असून महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील एक डोंगरी किल्ला आहे. या गडावरून अनेक किल्ल्यांचे दर्शन होते. हरिश्चंद्रगड समुद्रसपाटीपासून 1424 मीटर उंचीवर आहे. हरिश्चंद्रगड हा माळशेज घाटात असलेला अजस्र डोंगर आहे. हा गड चढण्यासाठी मध्यम स्वरूपाचा आहे. या गडाजवळ पाचनई, खिरेश्वर हे गाव आहेत.