अहमदनगर हादरलं! वर्षभरापूर्वीच नोकरी मिळाली आणि... महिला पोलीस कर्मचाऱ्याचे कामावरुन परतातच उचललं टोकाचं पाऊल

रात्रपाळीवरुन रविवारी कामावरुन घरी परतताच महिला पोलीस कर्मचाऱ्याने घराचा दरवाजा लावून घेतला. बराच वेळ दरवाजा न उघडल्याने घाबरलेल्या मुलाने शेजारच्यांच्या मदतीने दरवाजा उघडाला मात्र समोर त्याची आई मृतावस्थेत होती

Updated: Jan 8, 2023, 05:27 PM IST
अहमदनगर हादरलं! वर्षभरापूर्वीच नोकरी मिळाली आणि... महिला पोलीस कर्मचाऱ्याचे कामावरुन परतातच उचललं टोकाचं पाऊल  title=

Ahmednagar News : अहमदनगरमध्ये पोलीस नियंत्रण कक्षात कार्यरत असलेल्या एका महिला कर्मचाऱ्याने राहत्या घरी गळफास घेतल्याची घटना समोर आली आहे. पतीच्या निधनानंतर अनुकंपा तत्वातर (compassion) या महिलेला पोलीस दलात (Maharashtra Police) वर्षभरापूर्वीच नोकरी मिळाली होती. रविवारी सकाळी कामावरुन परतल्यानंतर महिला पोलीस कर्मचाऱ्याने दरवाजा लावून घेतला आणि आत्महत्या केली. बराच वेळ दरवाजा न उघडल्याने तो उघडण्यात आला. यावेळी महिलेने गळफास घेतल्याचे समोर आले.

रात्रपाळी करुन घरी परतल्या आणि...

अर्चना रावसाहेब कासार असे या महिला पोलीस अंमलदाराचे नाव असल्याची माहिती समोर आलीय. अहमदनगरच्या पोलीस अधीक्षक कार्यालयातील जिल्हा पोलीस नियंत्रण कक्षात काम पाहत होत्या. शनिवारी रात्रपाळी असल्याने कासार या रविवारी सकाळी काम संपवून रविवारी सकाळी बोल्हेगाव  येथे त्यांच्या घरी परतल्या होत्या. यानंतर त्यांनी घराचा दरवाजा लावून घेतला. बराच वेळ झाला तरी कासार यांनी दरवाजा न उघडल्याने त्यांच्या मुलाच्या मनात शंका निर्माण झाली. यानंतर मुलाने शेजारच्यांच्या मदतीने दार उघडले. यावेळी कासार या गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्या. 

रुग्णालयात पोहोचण्याआधीच मृत्यू

तोफखाना पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर महिला पोलिसांच्या मदतीने कासार यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांचा आधीच मृत्यू झाल्याचे सांगितले. दरम्यान, तोफखाना पोलीस ठाण्यात या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 
आत्महत्येमागचे कारण अद्याप अस्पष्ट

अर्चना कासार यांच्यामागे आता एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार उरला आहे. वडिलांननंतर आईलाही गमावल्याने दोन्ही भावंडांवर दुखःचा डोंगर कोसळला आहे. अर्चना कासार या रावसाहेब कासार यांच्या मृत्यूनंतर अनुकंपा तत्वावर पोलीस दलात दाखल झाल्या होत्या. नोकरीच्या वर्षभरानंतरच कासार यांनी टोकाचे पाऊल उचलल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. कासार यांच्या आत्महत्येमागचे कारण अद्याप समोर आले नसले तरी कौटुंबिक कलहातून त्यांनी हे पाऊल उचलल्याची चर्चा पोलीस दलात आहे. कासार यांनी आत्महत्येनंतर सुसाईड नोट लिहिल्याचेही म्हटले जात असले तरी यावृत्ताला पोलिसांनी दुजोरा दिलेला नाही.