Thane : ठाणे महापालिकेवर भाजपचा झेंडा लागला पाहिजे. असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेअर बावनकुळे जेव्हा ठाण्यात आले होते तेव्हा त्यांनी हे विधान केलं होतं. त्यानंतर शनिवारी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना भाजपचे नेते व माजी खासदार संजीव नाईक यांनी ठाणे महापालिकेच्या निवडणुकांबाबत एक सुचक विधान केलं. यावेळी ते म्हणाले की, युती करायची की नाही करायची हे आमचे वरिष्ठ नेते ठरवतील. वरिष्ठ नेत्यांनी घेतलेला निर्णय आम्हाला मान्य असेल अस त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.
अशातच आता उद्या म्हणजेच 24 फेब्रुवारी रोजी भाजपचे ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख व राज्याचे वनमंत्री गणेश नाईक जनता दरबार घेणार आहेत. याचाच आढावा व तेथील व्यवस्था पाहण्यासाठी माजी खासदार संजीव नाईक शनिवारी दाखल झाले होते. सध्या भाजपचे सदस्य नोंदणी अभियान सुरू आहे. राज्यात एक कोटी सदस्यांचा टप्पा पार झाला असून लवकरच पक्षाचे ३ कोटी सदस्य होतील. प्रत्येकजण आपले पक्ष संघटन मजबूत होण्यासाठी प्रयत्न करत असतो. संघटना वाढवण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याला ताकद देणं गरजेचं आहे. असं संजीव नाईक यावेळी म्हणाले.
ठाण्यात गणेश नाईकांचा जनता दरबार
24 फेब्रुवारी रोजी गणेश नाईक यांचा ठाण्यात जनता दरबार पार पडणार आहे. दहा वर्षानंतर वनमंत्री गणेश नाईक यांचा हा जनता दरबार होणार आहे. त्यामध्ये ठाण्यातील नागरिकांचे जे काही प्रश्न आणि अडचणी असतील त्या त्यांना मनमोकळ्या पणाने मांडता येणार आहेत. यासाठी आतापर्यंत मोठ्या प्रमाणात अर्ज देखील प्राप्त झाले आहेत. त्यामुळे ठाण्यातील गणेश नाईक यांच्या जनता दरबारला मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे. या दरबारासाठी कशी व्यवस्था करण्यात आली आहे. याचाच आढावा पोलिस अधिकारी, महसूल अधिकारी आणि वन विभागाचे अधिकारी या सर्वांनी घेतला.
कारण, जनतेचा दरबार असल्यामुळे येथे नागरिकांच्या समस्या सोडविल्या जाणार आहेत. असं संजीव नाईक म्हणाले. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि वनमंत्री गणेश नाईक हे तिन्ही नेते ठाणे जिल्ह्यातील राज्याचे मंत्री आहेत. त्यामुळे आता या जनता दरबारमध्ये ठाणे जिल्ह्यातील नागरिकांचे सर्व प्रश्न सुटतील असा विश्वास संजीव नाईक यांनी व्यक्त केला.