मला चारही बाजुने घेरलंय, मी तुमच्यात असो वा नसो पण..., मनोज जरांगे का झाले भावूक?

Manoj Jarange Dasara Melava:  मनोज जरांगेनी मराठा बांधवांना भावनिक साद घातली. तसेच सरकारला इशाराही दिला. काय म्हणाले जरांगे? जाणून घेऊया. 

Pravin Dabholkar | Updated: Oct 12, 2024, 04:34 PM IST
मला चारही बाजुने घेरलंय, मी तुमच्यात असो वा नसो पण..., मनोज जरांगे का झाले भावूक? title=
मनोज जरांगे

Manoj Jarange Dasara Melava: आज राज्यभरात 5 महत्वाचे दसरा मेळावे पार पडत आहेत. यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मेळाव्यात प्रमुख मोहन भागवत यांनी संबोधन केले. मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे मेळावे पार पडले. काही वेळात एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडेल. दरम्यान मनोज जरांगेच्या सभेला तूफान गर्दी पाहायला मिळाली. यावेळी मनोज जरांगेनी मराठा बांधवांना भावनिक साद घातली. तसेच सरकारला इशाराही दिला. काय म्हणाले जरांगे? जाणून घेऊया.   

आता तुम्हाला धक्का लागला नाही का?

मला चारही बाजुने पूर्ण घेरलंय, मला संपवण्यासाठी कारस्थान सुरुय. माझा नाविलाज आहे. माझ्या समाजाच्या लेकरांना त्यांच्यामुळे कलंक लावून देऊ नका. मी तुमच्यात असो वा नसो. माझा समाज आणि लेकरांना संपवू देऊ नका, असे मनोज जरांगे यावेळी म्हणाले. 
17 जाती आरक्षणात घातल्या, आता तुमच्या आरक्षणाला धक्का लागत नाही का? आता तुम्हाला धक्का लागला नाही का? धक्का लागतो म्हणणारा कुठेय? आमच्यात येऊ नको म्हणणारा कुठेय? मराठ्यांचा इतका द्वेश का? तुम्ही सरकारकडून लिहून घेतलं का? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. 

आचारसंहिता लागायच्या आत सगळ्या मागण्या पूर्ण करा

तुम्ही कितीही आंदोलने करा आम्ही तुमच्या नाकावर टिच्चून निर्णय घेतलाय, असे ते म्हणाले. आपल्यावर आपल्या डोळ्यादेखत अन्याय करत असले तर समोरच्याला उचलून फेकावे लागणार, असे जरांगे म्हणाले. आचारसंहिता लागल्यानंतर मुख्य भूमिका जाहीर करणार असल्याचे विधान यावेळी त्यांनी केले. इथून मला सर्वकाही सांगता येणार नाही. आता सर्व जवळ आलंय. त्यांनी सर्व केल्याशिवाय आपला निर्णय घ्यायचा नाही. एकाएकी उलटा निर्णय घ्यायचा. तुमची इच्छा पूर्ण करण्याची जबाबदारी माझी. तुमचा मान, शान, लेकरं सुखी करण्याची जबाबदारी मी माझ्या खांद्यावर घेतली. आचारसंहिता लागायच्या आत सगळ्या मागण्या पूर्ण करा, अन्यथा सरकार उलथवून टाकायला हा समाज मागे पाहणार नाही, असा थेट इशाराच जरांगेंनी दिला.

अन्याय झाला तर स्वसंरक्षण करावचं लागेल

अन्यायाच्या विरोधात उठाव करावाच लागतो. का आमच्या वाट्याला अन्याय आलाय. असं आम्ही काय पाप केलं? माना आमच्या कापल्या पण न्याय तुम्हाला दिलाय. मग आमच्यावर अन्याय का? असा प्रश्न त्यांनी विचारला. मी जिवंत आहे तोपर्यंत तुमच्या डोळ्यात पाणी नाही बघू शकत. कोणत्याही जहागीरदाराची औलाद येऊदे. झुकायचं नाही. कोणावर अन्याय करायच नाही. पण समाजावर अन्याय होत असेल तर स्वसंरक्षण करावचं लागेल, असे ते म्हणाले

जाताना आनंद घेऊन जा. दु:ख मला देऊन जा

आपल्याला जाणिवपूर्वक टार्गेट केलं जातंय. तुमच्या लेकरांसाठी, समाजासाठी आपल्याला उलथापालथ करावीच लागणार आहे. मला एकच वचन द्या. हट्ट धरु नका. मी कधीच तुमच्या शब्दाच्या पुढे जाणार नाही.तुमचं हीत सोडून काम करणार नाही, असा शब्द जरांगेंनी मराठा समाजाला दिला. जाताना आनंद घेऊन जा. दु:ख माझ्याकडे देऊन जा. वेळप्रसंगी मरण पत्करेल पण तुमची मान खाली घालू देणार नाही, असेदेखील जरांगे यावेळी म्हणाले.