मुंबईत खळबळ! दहावीतल्या मुलीने स्वतःच्याच लैंगिक अत्याचाराचा बनाव रचला, कारण...

Mumbai Crime News: मुंबईतून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दहावीतल्या मुलीने स्वतःच्याच अपहरणाचा बनाव रचला आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Sep 30, 2024, 08:33 AM IST
 मुंबईत खळबळ! दहावीतल्या मुलीने स्वतःच्याच लैंगिक अत्याचाराचा बनाव रचला, कारण...  title=
mumbai news today 16 Yr Old Girls Stages Own Kidnapping To Avoid Mother s Scolding

Mumbai Crime News: अल्पवयीन मुलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच भांडुपमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 15 वर्षांच्या शाळकरी मुलीने स्वतःच्याच अपहरणासह लैंगिक अत्याचाराचा बनाव रचला. पोलिसांच्या तपासात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

भांडुप पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी ही घटना घडली आहे. दहावीच्या वर्गात शिकणारी मुलगी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास शाळेतून निघाली मात्र 1 वाजले तरी ती घरी पोहोचली नव्हती. मुलगी अजूनही घरी परतली नाही हे पाहताच तिचे पालक घाबरले. त्यांनी तिचे वर्गमित्र आणि शाळेत चौकशी केली. मात्र ती कुठे गेली हे कोणालाच माहिती नव्हतं. तिच्या घरच्यांनीही तिचा शोध घेतला.  तेव्हा ती रेल्वे स्थानकाच्या बाहेर बसलेली दिसली. 

मुलगी सापडल्यानंतर तिला घरच्यांनी विचारलं तेव्हा तिने सांगितलं की, तीन जणांनी तिचे अपहरण केले. शाळेतून निघाल्यावर तिला ऑटोरिक्षामध्ये बसवून स्थानकाजवळ नेले. त्यांनी लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केला मात्र मासिक पाळी आल्याने त्यांनी मला सोडून दिले, असं तिने पालकांना सांगितले. त्यानंतर तिच्या पालकांनी लगेचच पोलिस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. अपहरण आणि पॉक्सोअंतर्गंत अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. 

तपासासाठी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. मात्र मुलीच्या जबाबात तफावत जाणवल्यामुळं त्यांना संशय आला. सीसीटीव्ही फुटेजनुसार, मुलगी शाळेतून एकटीच रेल्वे स्थानकाच्या दिशेने गेल्याचे दिसले. त्यानंतर पोलिसांनी त्या मुलीची चौकशी केली. तेव्हा तिने घडलेला सगळा प्रकार सांगितला. तसंच, हा बनाव रचल्याचं देखील तिने म्हटलं कबुल केलं आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, आईचा ओरडा खावा लागू नये म्हणून तिने अपहरणाची कहाणी रचल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. दहावीचे वर्ष असल्याने अभ्यासावर लक्ष दे असं वारंवार आई सांगायची. मात्र अभ्यासाकडे दुर्लक्ष झाल्याने आईचा ओरडा पडेल या भीतीने तिने हा डाव रचला आहे. तसंच, जेव्हा तिच्या कुटुंबीयांना ती रेल्वे स्थानकावर सापडली तेव्हा ती खूप घाबरली आणि तिने लगेचच अपहरणाची खोटी कहाणी रचली, असं तिने म्हटलं आहे. मुलीने स्वतःच कबुल केल्यानंतर आता अपहरणाचा तपास पोलिसांनी बंद केला आहे.