'मुलांचा लसींआभावी मृत्यू पण सरकार गायींना...'; राऊतांचा हल्लाबोल; म्हणाले, 'महाराष्ट्रात...'

Government Concern About Cows Kids Are Dying: मोठे रस्ते बांधताय, पुतळे उभारताय, मेट्रो आणि बुलेट ट्रेन आणताय. विकासाच्या गप्पा मारताय, पण आमच्या मुलांच्या तापावर धड इलाज होत नाहीत."

स्वप्निल घंगाळे | Updated: Oct 6, 2024, 07:33 AM IST
'मुलांचा लसींआभावी मृत्यू पण सरकार गायींना...'; राऊतांचा हल्लाबोल; म्हणाले, 'महाराष्ट्रात...' title=
राऊत यांची 'सामना'मधून टीका

Government Concern About Cows Kids Are Dying: उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे प्रवक्ते तसेच खासदार संजय राऊत यांनी कठोर शब्दांमध्ये राज्यातील आरोग्य व्यवस्थेवर टीका केली आहे. राज्यातील मुख्यमंत्र्यांना तापाने फणफणलेल्या मुलांच्या मातांना भेटण्यासाठी वेळ नाही. या मुलांना लसी न मिळाल्याने अनेक मृत्यू झाले आहेत, असं सांगताना राऊत यांनी गायींसाठी सरकारकडे पैसा असून मुलांसाठी अशा शब्दांमध्ये टीका केली आहे.

मुलांपेक्षा त्यांना गायी महत्त्वाच्या वाटल्या

"दिनांक 2 ऑक्टोबर. सकाळी 11 वाजता मलबार हिलच्या ‘सह्याद्री’ अतिथीगृहावर जे घडले ते चित्र महाराष्ट्राला काळिमा फासणारे आहे. तापाने (मेंदुज्वर) फणफणलेल्या मुलांना घेऊन असंख्य ‘माता’ सह्याद्री अतिथीगृहाबाहेर पोहोचल्या. त्या मुलांना सह्याद्री अतिथीगृहाच्या बाहेर रस्त्यावर ठेवून ‘माता’ आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करू लागल्या. ‘सह्याद्री’त देशाचे गृहमंत्री अमित शहा व मुख्यमंत्री शिंदे यांच्यात राजकीय बैठक सुरू होती व त्या मातांना मुख्यमंत्र्यांना भेटायचे होते. कारण तापाने फणफणलेल्या मुलांना ‘लस’ मिळत नाही. सरकार मुलांच्या आरोग्याच्या बाबतीत हेळसांड करीत आहे. मुले तडफडत आहेत. त्यांचे प्राण वाचवा, असे सांगण्यासाठी ‘माता’ सह्याद्रीवर पोहोचल्या, पण त्यांना पायरीवरच रोखले गेले. “मोठे रस्ते बांधताय, पुतळे उभारताय, मेट्रो आणि बुलेट ट्रेन आणताय. विकासाच्या गप्पा मारताय, पण आमच्या मुलांच्या तापावर धड इलाज होत नाहीत. त्यांना लस मिळत नाही,” अशी वेदना ‘सहय़ाद्री’च्या बाहेर एका मातेने मांडली. ती वेदना अस्वस्थ करणारी आहे. निवडणूक कार्यात गुंतलेल्या देशाच्या गृहमंत्र्यांना या वेदनेची दखल घ्यावी असे वाटले नाही. मुलांपेक्षा त्यांना गायी महत्त्वाच्या वाटल्या," असा टोला संजय राऊत यांनी 'रोखठोक' या लेखातून लगावला आहे.

गायींना वाचविण्यासाठी पैसे

"आता सरकारने गायींना राज्यमातांचा दर्जा दिला. गायी जगवण्यासाठी निधी मंजूर केला. लाडक्या बहिणींना महिन्याला पंधराशे रुपयांची मदत सुरू केली. आरोग्य खात्यापासून शिक्षणापर्यंतचा सर्व निधी लाडक्या बहिणी व गायींच्या संवर्धनासाठी वळवला. त्यामुळे महाराष्ट्राचे आरोग्य व्यवस्थेचे स्मशान झाले व तापाने फणफणलेल्या मुलांना घेऊन माता-भगिनी ‘सह्याद्री’च्या बाहेर उभ्या ठाकल्या. ‘सह्याद्री’बाहेर तापाने फणफणलेल्या मुलांकडे सरकारने लक्ष दिले नाही. कारण सरकार भ्रष्टाचारात व राजकारणात गुंतून पडले आहे. ‘सह्याद्री’बाहेर तापाने फणफणलेल्या मुलांचे आंदोलन हे महाराष्ट्रातील माणुसकीचे अधःपतन आणि दारिद्र्याचे दृश्य आहे. मुलांना औषध व लस मिळत नाही. काही मुलांचे मृत्यू त्यात झाले व हे लोक गायींना वाचविण्यासाठी पैसे खर्च करीत आहेत. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना ताबडतोब बडतर्फ करावे व सदोष मनुष्यवधाचा खटला भरावा असा कारभार राज्याच्या आरोग्य खात्यात सुरू आहे," असं राऊत म्हणाले आहेत.

नक्की वाचा >> '...म्हणजे पंतप्रधानपदाची जबाबदारी आपल्याकडे यावी अशी अजित पवारांची इच्छा असेल'; आमदाराचं वक्तव्य

महाराष्ट्रात गरीबांची थट्टा

"आरोग्य खात्यात डॉक्टर, नर्सच्या बदल्या-बढत्या व नेमणुकांत भ्रष्टाचार आहे. सिव्हिल सर्जन, जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना नेमणुका करून घेण्यासाठी पैसे मोजावे लागतात व ते पैसे वसूल करण्यासाठी लहान मुलांना तापाने फणफणून तडफडत मरावे लागते. आदिवासी पाड्यांवरील दवाखाने बंद आहेत. तेथे डॉक्टर्स नाहीत. रुग्णवाहिका नाहीत. गर्भवतींना चादरीच्या झुल्यात बसून तालुक्याच्या ठिकाणी न्यावे लागते. त्यात बाळ आणि बाळंतिणीचा अनेकदा मृत्यू होतो. इस्पितळांची व्यवस्था भयानक आहे. स्वच्छता नाही. तेथे जेवणही निष्कृष्ट दर्जाचे. अनेक इस्पितळांत पोस्टमॉर्टेमची व्यवस्था नाही. लहान मुलांवर तापाचे उपचारही होत नाहीत. मुलांना घेऊन माता मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी मलबार हिलवर पोहोचतात तेव्हा अमित शहांबरोबर राजकीय बैठकीत गुंतलेले मुख्यमंत्री त्या मातांना भेटत नाहीत. महाराष्ट्रात गरीबांची थट्टा सुरू आहे. ती सध्या तरी थांबेल असे दिसत नाही," असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.