मुंबईतील कालची परिस्थिती ही वादळसदृष्य - आयुक्त चहल

नरिमन पॉईंट आणि कुलाबाच्या इतिहासात काल सर्वाधिक पाऊस

Updated: Aug 6, 2020, 12:04 PM IST
मुंबईतील कालची परिस्थिती ही वादळसदृष्य - आयुक्त चहल title=

मुंबई : मुंबईत मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीबाबत माहिती देताना मुंबईचे महापालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी म्हटलं की, मुंबईतील परिस्थिती आता नियंत्रणात आहे. मुंबईतील कालची परिस्थिती ही वादळसदृष्य असल्याचं देखील आयुक्त चहल यांनी म्हटलं आहे. 

भिंत खचल्यामुळे अंदाजे 50 झाडं उन्मळून पडली आहेत. हाजीअलीकडे जाणारी एकेरी वाहतूक दुपारी एक पर्यंत सुरू करण्याचा प्रयत्न आहे. तसेच पाण्याची पाईप लाईन दुरुस्त करायला 24 तास लागतील. 25 भागात पाणी पुरवठा खंडित झाला आहे. त्या ठिकाणी 50 पाण्याच्या टँकरने पाणी पुरवठा केला जाईल अशी माहितीही आयुक्तांनी दिली आहे. 

'काल विक्रमी पाऊस पडला आहे. 300 मिमी इतका पाऊस तीन तासात पडला आहे. वारे सुद्धा 120 किलोमीटर प्रति ताशी वाहत होते. त्यामुळे कालच्या परिस्थितीला वादळ म्हणायला हरकत नाही. नरिमन पॉईंट आणि कुलाबाच्या इतिहासात कधी एवढा पाऊस पडला नाही. मी सुद्धा मुंबईत अनेक वर्षांपासून राहतो. 26 जुलैला सुद्धा एवढा पाऊस ह्या भागात पडला नव्हता.' अशी माहितीही चहल यांनी दिली.