मुंबई सकाळपासून संततधार सुरू, सखोल भागात साचलं पाणी

अनेक भागात साचलं पाणी

Updated: Jul 10, 2018, 10:44 AM IST
मुंबई सकाळपासून संततधार सुरू, सखोल भागात साचलं पाणी title=

मुंबई : मुंबईत आज सकाळपासून पुन्हा एकदा संततधार सुरू झाली आहे. त्यामुळे हिंदमाता परिसरात पाणी साचलं आहे. तिन्ही मार्गावरची वाहतूक उशिरानं सुरू आहे. सकाळी सात वाजता संपलेल्य़ा २४ तासात मुंबई शहरात १६२ पूर्व उपनगरात ११२ तर पश्चिम उपनगरात १६२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. येत्या २४ तासात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. रात्रभर मुसळधार बरसल्यावर पहाटेच्या सुमारास पावसानं विश्रांती घेतली. पण साडे सातच्या नंतर मुलुंड, भांडूप, दादर, वडाळा, बोरीवली या उपनगरांमध्ये जोरदार पावसानं पुनरागमन केलं. दिवसभर पाऊस असाच थांबून थांबून बरसत राहणार आहे.

मुंबईच्या बोरीवलीत गेल्या चार दिवसापासून सुरु असलेल्या पावसामुळे रात्री १०च्या सुमारास ३ घरं कोसळली. या दुर्घटनेत कुणीही जखमी झालेलं नाही. एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाचे जवान तातडीनं घटनास्थळी पोहचल्यानं लोकांना दिलासा मिळाला. सरकार मुंबईकरांच्या स्थितीविषयी अत्यंत असंवेदनशील असल्याचा आरोप अजित पवार यांनी केला. तर पावसाच्या स्थितीवर पूर्ण लक्ष असून मुंबईच्या शाळांना मात्र आज सुट्टी देण्यात आलेली नाही असं शिक्षण मंत्री विनोद तावडेंनी म्हटलं आहे.