माझी अटक बेकायदा ठरवल्याने आता..., संजय राऊतांचं मोठं वक्तव्य!

संजय राऊतांनी बाहेर येताच अटकेबाबत दिली पहिली प्रतिक्रिया

Updated: Nov 9, 2022, 08:00 PM IST
 माझी अटक बेकायदा ठरवल्याने आता..., संजय राऊतांचं मोठं वक्तव्य! title=

मुंबई : पत्राचाळ प्रकरणात अटकेत असलेले ठाकरे गटाचे फायरब्रँड नेते संजय राऊत यांना तब्बल 100 दिवसांनी जामीन मंजूर झाला आहे.  संजय राऊत बाहेर आल्यावर त्यांच्यामध्ये तोच उत्साह असलेला पाहायला मिळाला. राऊतांच्या समर्थकांनी त्यांचं जंगी स्वागत केलं. यावेळी राऊतांनी बाहेर आल्यावर गळ्यात भगवं उपरणं फडकावत हात जोडून सर्वांना अभिवादन केलं आणि बाळासाहेबांच्या स्मृती स्थळावर दर्शनासाठी जात आहेत. (MP Sanjay Raut Bail Granted)

कोर्टाने माझी अटक बेकायदेशीर ठरवली आहे. आता देशातील जनतेचा न्यायालयावरचा विश्वास वाढणार असल्याचं संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे. राऊत उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याची माहिती समजत आहे. या भेटीनंतर राऊत रूग्णालयात जाणार असल्याचंही बोललं जात आहे. 

संजय राऊत यांचा जामीन मंजूर करताना ईडीला फटकारलं आहे. संजय राऊत आणि प्रविण राऊत यांना केलेली अटक बेकायदा आहे. दोघा आरोपींना समान वागणुकीचा हक्क आहे. ईडीने मुख्य आरोपी असलेल्या राकेश आणि सारंग वाधवान यांनी केलेल्या गैरव्यवहाराप्रकरणी त्यांना अजुनही अटक केलेली नाही यात दुजाभाव दिसून येत आहे. दोन्ही आरोपींनी सर्व शर्तींचे समाधानकारकरित्या पालन केलं आहे. त्यामुळे जामिनावर असताना त्यांच्याकडून कोणताही गैरव्यवहार नसल्याचं दिसत असल्याने जामीन मंजूर करण्यात येत आहे, असं कोर्टाने म्हटलं आहे.