साईभक्तांसाठी मोठी बातमी, तासनतास दर्शनरांगेत उभं राहण्यापासून होणार सुटका...

शिर्डीत आल्यानंतर भाविकांना एकाच छताखाली उपलब्ध होणार सर्व सुविधा, अत्याधुनिक दर्शनरांग आणि साईभक्तांच्या सुरक्षेची विशेष काळजी घेतली जाणार

Updated: Dec 20, 2022, 09:39 AM IST
साईभक्तांसाठी मोठी बातमी, तासनतास दर्शनरांगेत उभं राहण्यापासून होणार सुटका... title=

कुणाल जमदाडे, झी मीडिया, शिर्डी : साईबाबांच्या (Sai Baba) दर्शनासाठी तासनतास दर्शनरांगेत उभे राहण्यापासून भक्तांची आता सुटका होणार आहे.. साईबाबा संस्थानने (SaiBaba Sansthan) तब्बल 109 कोटी रूपये खर्चून बांधलेले अत्याधुनिक दर्शनरांग कॉम्प्लेक्स लवकरच सुरू होणार आहे. साईबाबांच्या दर्शनासाठी दररोज देशभरातून हजारो भाविक (Devotee) हजेरी लावत असतात. त्यांना साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी तासनतास दर्शनरांगेत उभं रहावं लागतंय. आता मात्र नव्याने बांधण्यात आलेल्या दर्शनरांगेत भक्तांना मोठा दिलासा मिळणार आहे. अत्याधुनिक दर्शनरांग हि संपूर्ण वातानुकूलीन असून साईभक्‍तांच्या सुरक्षेची विशेष काळजी यात घेण्यात आलीय.

एकाच छताखाली सर्व सुविधा
शिर्डीत आल्यानंतर भक्तांना दर्शनपास कांऊटर, लॉकर, चप्पल स्टॅण्ड ,लाडू कांऊटर, डोनेशन कांऊटर, ऊदी स्टॉल, टॉयलेट अशा अनेक गोष्टींची शोधाशोध करावी लागते. आता मात्र एकाच छताखाली सर्वकाही सुविधा करण्यात आल्या आहेत. या नव्याने बांधण्यात आलेल्या दर्शनरांगेत 11 हजार भाविक बसू शकतील असा वातानुकूलीन हॉल बनवण्यात आला असून जिथे भक्तांना बसता येईल आणि आल्हाददायक दर्शन कसे दिले जाईल याची विशेष काळजी घेण्यात आलीय.

संस्थानचा महत्वाकांक्षी प्रकल्प
साईबाबा संस्थानचा हा महत्वकांशी प्रकल्प असून तिरूपती बालाजीच्या (Tirupati Balaji) धर्तीवर त्यांच्यापेक्षाही सुसज्ज अशी हि दर्शनव्यवस्था निर्माण करण्यात आली आहे. महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radha Krushna Vikhe Patil) आणी खासदार सुजय विखे (Sujay Vikhe Patil) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदिंची (PM Narendra Modi) भेट घेऊन शिर्डीत हि दर्शनव्यवस्था,  शैक्षणिक संकुल आणी निळवंडे धरणाचे लोकार्पण करण्याचे त्यांना निमंत्रण दिलं आहे .  साधारण मार्च महिन्यात पंतप्रधानांच्या हस्ते हा उद्घाटन कार्यक्रम पार पडणार असल्याचं विखे पाटील यांनी म्हणटलंय.

नव्याने बांधण्यात आलेल्या या दर्शनव्यवस्थेमुळे देशभरातून आलेल्या भाविकांना साईबाबांचे आनंददायी आणी सुरक्षित दर्शन घेता येणार असल्याने हा प्रकल्प साईभक्तांच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे...