उद्धव ठाकरे यांचं भाषण म्हणजे..., चंद्रकांत पाटील यांची बोचरी टीका

केंद्र आणि भाजपच्या नावाने शिमगा केला, पण राज्यातील प्रश्नावर काहीच बोलले नाहीत, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

Updated: Oct 15, 2021, 09:58 PM IST
उद्धव ठाकरे यांचं भाषण म्हणजे..., चंद्रकांत पाटील यांची बोचरी टीका title=

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार घणाघात केला. यावर बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी, शिमगा अजून लांब आहे हे मुख्यमंत्री यांच्या लक्षात आलं नाही, त्यांनी दसऱ्यालाच शिमगा करून टाकला, अशी टीका केली आहे. केंद्र आणि भाजपच्या नावाने त्यांनी शिमगा केला, पण राज्यातील महिला अत्याचार आणि शेतकऱ्यांच्या मुद्दयावर बोलले नाहीत, अशी टीकाही चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. 

राज्यात महिला अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत, त्यांच काय करणार? दिशा कायदा कधी अमलात आणणार? शेतकऱ्यांचा प्रचंड आक्रोश आहे, त्याचं काय करणार आहात? शेतकऱ्यांना दिलेल्या पॅकेजची फोड करा? असे सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केले आहेत. 

पंढरपूरमध्ये उमेदवार आयात करावा लागला असं उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात म्हटलं. यावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, पंढरपूरचा उल्लेख करता मग अब्दुल सत्ता कुठून आले. भाजप खासदार चिंतामण वनगा यांचं निधन झाल्यावर त्यांच्या मुलाला तुम्ही पळवलं आणि उमेदवारी दिली. अनेक ठिकाणी तु्म्ही शिवसेनेला जागा घेतली, पण उमेदवार भाजपचे घेतले असा टोला लगावत हे राजकारणात चालतं पण तुम्ही हे विसरलात, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. 

सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भाषणावर बोलले तर तर अधिक गंभीर आहे, स्वातंत्र्य लढ्यात तुम्ही कुठे होतात, तुमाच जन्म तरी झाला होता का? स्वातंत्र्य लढ्यात शिवसेना कुठे होती? असे सवाल करत चंद्रकांत पाटील यांनी इतिहास आपल्याल माहित नाही असा टोला लगावला. 1925 मध्ये संघाची स्थापना झाली, त्यावेळी स्वातंत्र्य लढा तीव्र झाला होता, डॉ. हेडगेवार यांनी संघ स्थगित ठेवला आणि स्वातंत्र्य लढ्यात सामील झाले आणि त्यानंतर पुन्हा संघाची सुरुवात केली, अशी आठवण चंद्रकांत पाटील यांनी करुन दिली.

आजच्या भाषणात कशाचा कशाला मेळ नव्हता, भारत माता की जयची तर तुम्ही चेष्टाच केली अशी टीकाही चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. अरबी समुद्रातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं काय झाले, वारंवार बाबरी मशीद पाडण्याचे श्रेय घेता, तुमच्या पैकी एक तरी तिथे उपस्थित होता का? कोणी जबाबदारी घेणार नसेल तर मी घेतो अस बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना तो अधिकार आहे, तूम्हाला नाही. तुम्हाला आत्ता हिंदुत्व आणि राम मंदिर आठवतं, काहीतरी वेगळेच समीकरण दिसतंय असा आरोपही चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

पैसे गोळा केले आणि केंद्रा पाठवले असा आरोप करता, तुम्ही काय केलं, कोव्हीडमध्ये सगळं केंद्राकडून घेतलं असा निशाणाही चंद्रकांत पाटील यांनी साधला.