केंद्राची प्रतिमा मलीन केली जात आहे - देवेंद्र फडणवीस

'केंद्राकडून वेगवेगळ्या मार्गाने राज्याला मदत होत आहे'

Updated: May 26, 2020, 04:57 PM IST
केंद्राची प्रतिमा मलीन केली जात आहे - देवेंद्र फडणवीस title=

मुंबई : केंद्राची प्रतिमा मलीन केली जात आहे, केंद्राने सर्व राज्यांना मदत केली आहे. राज्यात खोटा प्रचार केला जात असून अन्यायाचं वातावरण तयार केलं जात असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. कोरोनाच्या या परिस्थितीत केंद्राकडून वेगवेगळ्या मार्गाने मदत होत असल्याचं फडणवीसांनी सांगितलं.

केंद्राकडून गरिबांना स्वस्त धान्याचा पुरवठा केला जात आहे. केंद्राने 4 हजार 592 कोटींचं धान्य दिलं. मजूर छावण्यांसाठी केंद्राने पैसे दिले आहेत. उज्वला योजने अंतर्गत एक हजार 625 कोटी रुपये किंमतीचे सिलेंडर मोफत देण्यात आले. 600 श्रमिक रेल्वे सोडल्या, एका रेल्वेचा खर्च 50 लाख रुपये आहे, श्रमिक रेल्वेसाठी जवळपास 300 कोटी दिले आहेत. केंद्राने 28 हजार 104 कोटींची मदत राज्याला केली असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं.

शेतमालसाठी केंद्राने 9069 कोटी रुपये राज्याला दिले आहेत. पीपीई कीट, मास्क, रेशन, प्रवासी मजूरांचा खर्च, शेतमाल खरेदी खर्च, कापूस खरेदीसाठी अशा अनेक गोष्टींसाठी केंद्राकडून मदत होत आहे. जीएसटीसंदर्भात मनात येतील ते आकडे दिले जात असल्याचा आरोपही देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

केंद्र सरकारने GDPच्या 5 टक्के कर्ज घेता येईल असा निर्णय घेतला. यामुळे राज्याला एक लाख 60 हजार कोटी कर्ज घेता येऊ शकतं. राज्य सरकारने बोल्ड पावले उचलली पाहिजेत, असंही फडणवीस म्हणाले.