मोदी, राहुल संसदेत बोलत नाही, मात्र जनता सर्व ऐकत आहे : उद्धव ठाकरे

राहुल गांधी म्हणतात मला संसदेत बोलू दिले जात नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात मला बोलू दिले जात नाही, पण जनता समजूतदार आहे. जनता पाहात आहे कोण काय बोलतंय ते, असा खोचक टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.   

Updated: Dec 15, 2016, 07:50 PM IST
मोदी, राहुल संसदेत बोलत नाही, मात्र जनता सर्व ऐकत आहे : उद्धव ठाकरे title=

मुंबई : राहुल गांधी म्हणतात मला संसदेत बोलू दिले जात नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात मला बोलू दिले जात नाही, पण जनता समजूतदार आहे. जनता पाहात आहे कोण काय बोलतंय ते, असा खोचक टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.   

उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत गुरुवारी राष्ट्रवादी आणि भाजपमधील अनेक गुजराती नेत्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर उद्धव यांनी भाजपवर हल्लाबोल केला. तर दुसरीकडे नोटाबंदीच्या निर्णयावरुन संसदेत मोठा गदारोळ सुरू आहे. हिवाळी अधिवेशनाचा बहुतांश कालावधी नोटाबंदीवरुन झालेल्या गोंधळात वाया गेला आहे. यावरुन उद्धव ठाकरेंनी मोदी आणि राहुल गांधीवर निशाणा साधला. दरम्यान, दहशतवादी बुरहाण वाणीच्या कुटुंबाला दिलेल्या मदतीवरुनही उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका केली.

काश्मिरमध्ये अतिरेक्याच्या घरी पैसे घरपोच मिळत आहेत पण जे देशप्रेमी आहेत त्यांना पैशांसाठी रांगेत उभे रहायला लागत आहे. मात्र, जिल्हा बँकांमध्ये शेतकऱ्यांचे गरिबांचे पैसे आहेत. या बँकांवर निर्बंध लावून काय मिळविले? विजय माल्ल्याने काय जिल्हा बँकेतून कर्ज घेतले होते. आता अँक्सिस बँकेचा घोटाळा समोर येतोय. त्या बँकेला तर क्लिनचिट पण देऊन टाकली आहे.  सरकारने जाहीर करावे की आता शेतकऱ्यांच्या जिल्हा बँकांवर निर्बंध लावून ते पुढे शेतकऱ्यांवर इन्कम टॅक्स लावणार आहेत का? असा प्रश्न उद्धव यांनी उपस्थित केला.      

शिवसेनेबद्दल अनेक वेळा जाणीवपूर्वक गैरसमज पसरवले गेले. गुजराती समाजाने शिवसेनेसोबत आले पाहिजे असे बाळासाहेबांना नेहमी वाटायचे.  दुर्देवाने गेल्या काही दिवसांपासून देशात काय चालले आहे हे कोणाला कळलंय की नाही मला माहिती नाही. आजपर्यंत गुजराती समाजाचा दुरूपयोग केला गेला. वापरा आणि फेकून द्या, अशी भूमिका घेतली गेली. शिवसेनेत मी तुम्हाला रांगेत उभं करणार नाही. सध्या रांगेत उभे राहणे हा राष्ट्रीय कार्यक्रम झाला आहे, असा भाजपला चिमटा उद्धव ठाकरे यांनी काढला.

दरम्यान, नालासोपारा येथील शिवसैनिकाकडे मिळालेली रक्कम सुभाष देशमुख यांच्याकडे मिळालेल्या रक्कमेसारखी आहे का, हे आम्ही तपासून पाहतोय. असा टोला उद्धव यांनी भाजपला लगावला.