IPL 2021: ज्याला वर्ल्‍ड कप खेळायला रोखले गेले, तो खेळाडू आज आईपीएलचा उभरता तारा

इंग्लंड विरुद्धच्या टी -20 मालिकेत भाग घेऊन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रवेश करणारा खेळाडू आहे

Updated: Apr 14, 2021, 09:19 PM IST
IPL 2021: ज्याला वर्ल्‍ड कप खेळायला रोखले गेले, तो खेळाडू आज आईपीएलचा उभरता तारा  title=

मुंबई : इंग्लंड विरुद्धच्या टी -20 मालिकेत भाग घेऊन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रवेश करणारा खेळाडू आहे राहुल चहर(Rahul Chahar). टीम इंडियासाठी राहुल चहरची ओळख तशी कमी आहे, परंतु इंडियन प्रीमियर लीगच्या सर्वात यशस्वी टीम मुंबई इंडियन्ससाठी तो खूप महत्वाचा आहे आणि तेथूनच त्याला आपला खेळ दाखवण्याची संधी मिळाली.

जर यावर्षी मुंबईचा संघ पाच वेळा आयपीएल जिंकण्याचा विक्रम नोंदवत असेल तर, राहुल चहरचे त्यात योगदान कमी लेखले जाऊ शकत नाही. जर तुम्हाला याचा पुरावा हवा असेल तर, आयपीएलच्या 14 व्या सत्रातील मंगळवारी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धचा सामना पाहा. ज्यामध्ये राहुल चहरने 4 ओव्हरमध्ये 27 धावा देऊन 4 बळी घेतले. परंतु राहुल चहरची ओळख क्रिकेटमध्ये मुंबई इंडियन्सपेक्षा जुनी आहे.

जेव्हा दिग्गज भारतीय क्रिकेटपटू राहुल द्रविड अंडर 19 संघाचा कोच होता. तेव्हा अंडर19 विश्वचषक स्पर्धेसाठी संघाची निवड केली जात होती. मीडिया अहवालानुसार, माजी भारतीय वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसाद, यांचा बीसीसीआयचे कार्यवाह सचिव अमिताभ चौधरी यांच्याशी वाद झाला. हा वाद या गोष्टीसाठी होता की, लेगस्पिनर राहुल चहरला अंडर -19 विश्वचषक संघात का समाविष्ट केले नाही. प्रसाद हे राहुल चहरच्या बाजूने बोलत होते.

अहवालानुसार केवळ प्रसादच नव्हे तर, राहुल द्रविड यांनाही चहरची निवड करायची होती, पण तसे झाले नाही. कारण चहारला ज्या खेळाडूच्या बदल्यात टीममध्ये घ्यायचे होते, तो खेळाडू झारखंडचा डावखुरा स्पिनर अनुकूल रॉय होता. विशेष म्हणजे स्वत: अमिताभ चौधरी हे देखील झारखंडचे आहेत. अशा परिस्थितीत राहुल चहरला टीममध्ये जागा मिळाली नाही. त्यामुळे अनुकूल रॉय अंडर 19 विश्वचषक संघाचा भाग झाला.

त्यानंतर काळाचे चक्र फिरले आणि चहर इंडियन प्रीमियर लीगमधील सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्सचा भाग झाला. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे अनुकूल रॉयही मुंबई इंडियन्स भाग होता परंतु तो फक्त बेंचवर बसून राहिला. रॉयने मुंबईकडून आयपीएलचा एकच सामना खेळला आहे. 2019 च्या या सामन्यात त्याला एक विकेट मिळाला आहे. त्याच बरोबर राहुल चहरने आतापर्यंत 4 सीझन मुंबई टीमसाठी खेळून 33 सामन्यांत 34 बळी घेतले आहेत.