KBC 16 मध्ये अमिताभ बच्चन आणि आमीर खान यांनी त्यांच्या मुलांना दिला एक अनमोल सल्ला!

'महानायक का जन्मोत्सव' या विशेष भागात बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांचा 82 वा वाढदिवस साजरा करण्यासाठी आमिर खान आणि त्याचा मुलगा जुनैद खान उपस्थित असणार आहेत.

सोनेश्वर पाटील | Updated: Oct 10, 2024, 03:23 PM IST
KBC 16 मध्ये अमिताभ बच्चन आणि आमीर खान यांनी त्यांच्या मुलांना दिला एक अनमोल सल्ला! title=

Amitabh Bachchan and Aamir Khan : महानायक अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस हे केवळ एक सेलिब्रेशन उरलेले नाही. या शुक्रवारी 'महानायक का जन्मोत्सव' या विशेष भागात बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांचा 82 वा वाढदिवस साजरा करण्यासाठी आमिर खान आणि त्याचा मुलगा जुनैद खान उपस्थित असणार आहेत.

'महाराजा' चित्रपटातील अभिनयाबद्दल जुनैद खानचे कौतुक

खेळ चालू असताना अमिताभ बच्चन यांनी अलीकडच्या 'महाराजा' या चित्रपटातील अभिनयाबद्दल जुनैद खानचे कौतुक केले आणि त्याला विचारले की, आपल्या वडिलांच्या चित्रपट उद्योगातील व्यापक अनुभवातून तो काय शिकला. त्याला उत्तर देताना काहीशा औपरोधिक शैलीत आमीर खान म्हणाला, 'सुरुवातीला मी जुनैदला हा चित्रपट करू नकोस असे सांगितले होते. कारण त्याने अनेक स्क्रीन टेस्ट दिल्या होत्या आणि प्रत्येक वेळी त्याला नकार मिळाला होता. पण 'महाराजा'मध्ये मात्र त्याची निवड झाली. त्यामुळे मला वाटले की, त्याने हा चित्रपट करू नये.'

त्यावेळी जुनैदने सांगितले होते की, हा एकमेव चित्रपट त्याला मिळाला आहे. जर हा त्याने केला नाही तर अभिनयाची सुरुवात तो कशी करणार? जुनैद पुढे म्हणाला, 'मला थिएटर स्कूलमध्ये जायची इच्छा होती आणि वडीलांनी त्याला संमतीही दिली. त्यासोबतच त्यांनी मला एक मौल्यवान सल्ला देखील दिला. 'अनुभवाने तू अभिनय कुठेही शिकू शकतोस. पण जर तुला भारतीय चित्रपट उद्योगात यशस्वी व्हायचे असेल, तर तुला हिंदी भाषा आणि आपल्या देशाची संस्कृती नीट समजली पाहिजे. देशातल्या लोकांना तू भेटले पाहिजेस. नाहीतर, तू मोठा अभिनेता होशील, पण इथे उपयशी ठरशील!'

आमिर खानने दिला होता हा सल्ला

आमिर म्हणाला, 'मी त्याला बसने काश्मीर ते कन्याकुमारी प्रवास करण्याचाही सल्ला दिला. त्याला काही काळ स्थानिक लोकांसोबत राहायला सांगितले. त्यांच्या संस्कृतीशी ओळख करून घ्यायला सांगितले. मी त्याला म्हटले, हा प्रवास तुला ते शिकवेल, जे कोणतीही शाळा किंवा कॉलेज शिकवू शकत नाही.'

आमिरने जुनैदला दिलेल्या सल्ल्याशी सहमत होत अमिताभ बच्चन म्हणाले, 'अभिषेकला देखील मी हाच सल्ला दिला होता. मी त्याला गावातल्या लोकांसोबत मिळून मिसळून दोन तीन महिने तिथेच राहण्याचा सल्ला दिला होता कारण मला वाटते की, त्यामुळे त्याच्या अभिनय कारकिर्दीला खूप मदत होऊ शकते.'