बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपची मुलगी आलिया कश्यप 11 डिसेंबर रोजी आपला प्रियकर शेन ग्रेगोइरशी लग्न केलं. अनुराग कश्यपने मुलीला विवाहबंधनात अडकताना पाहणं आपल्यासाठी फार भावूक क्षण होता असं म्हटलं आहे. The Hollywood Reporter India ला दिलेल्या मुलाखतीत अनुराग कश्यपने खुलासा केला की, त्याला विवाहसोहळा सोडून जायचं होतं. पण त्याचा मित्र आणि चित्रपट निर्माता दिग्दर्शक मोटवाने याने त्याला रोखलं.
मुलाखतीदरम्यान अनुराग कश्यपने सांगितलं की, "जेव्हा माझी मुलगी जन्माला आली तेव्हा माझ्या त्याच भावना होत्या. मी इतकं का रडलो हे मला समजलं नाही, पण मी रडलो. तिच्या लग्नातही तेच झालं. मला वाटतं मी सलग 10 दिवस रडत होतो. मला का ते माहिती नाही, पण कोणासमोरही रडायला येत होतं".
पुढे त्याने सांगितलं की, "मुलीच्या लग्नात त्यांनी एकमेकांना हार घातले आणि हवन झालं तेव्हा मात्र मला असह्य होत होतं. मी फार उत्साही आणि भावनिक झालो होतो. मला लग्न सोडून जायचं होतं. तेव्हा रिसेप्शनही सुरु झालं नव्हतं. मी बाहेर जात होतो पण विक्रमादित्य मोटवानेने मला थांबवलं. त्याने मला बाहेर नेलं. आम्ही एका मोठ्या वॉकसाठी गेलो आणि नंतर परत आलो".
आलिया कश्यप आणि शेन यांनी आपलं कुटुंब आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत 11 डिसेंबरला लग्नगाठ बांधली. त्यांनी इंस्टाग्रामला आपल्या लग्नातील फोटो शेअर केले. अनुरागने फोटो शेअर करताना कॅप्शन दिली होती की, "ही पण गेली, शेन तिची काळजी घे. मी आता पुन्हा माझ्या हट्टी व्यक्तिमत्वाकडे जाईन. लग्न सुंदरपणे आयोजित केल्याबद्दल आभार. आल्याबद्दल सर्वांचे आभार".