...म्हणून अनिल अंबानी यांनी रिलायन्स इन्फ्रा कंपनी काढली विकायला

उद्योजक अनिल अंबानींच्या डोक्यावर कर्जाचं डोंगर...

Updated: May 25, 2020, 04:08 PM IST
...म्हणून अनिल अंबानी यांनी रिलायन्स इन्फ्रा कंपनी काढली विकायला  title=

मुंबई : उद्योजक अनिल अंबानी यांनी कर्ज फेडण्यासाठी कंपन्यांची विक्री करण्यास सुरूवात केली असल्याची बातमी समोर येत आहे. अंबानी यांनी चीनमधील तीन बँकांकडून ४ हजार ७६० कोटीचे  कर्ज घेतले आहे. हे कर्ज फेडण्यासाठी त्यांनी दिल्लीत वीज पुरवठा करणारी रिलायन्स इन्फ्रा कंपनी विकायला काढली आहे. शिवाय ही कंपनी विकत घेण्यासाठी तीन कंपन्यांनी बोली लावली आहे. इटलीतील एनेल ग्रुप, ग्रीनको आणि टोरंट पॉवर या तीन कंपन्यांनी या लिलावात सहभाग घेतला आहे. 

ही लिलाव प्रक्रिया पार पाडण्यासाठी  KPMG या संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे. चीनमधील बँकांकडून घेतलेले कर्ज लवकरात लवकर फेडण्याचे आदेश लंडनमधील न्यायालयाने अनिल अंबानी यांना नुकताच दिले आहेत. कर्जफेड न केल्यास तुरुंगात टाकण्याचा निर्वाणीचा इशारा न्यायालयाने अनिल अंबानी यांना दिला होता. त्यानुसार अंबानी यांनी पैसे गोळा करण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत.

चीनमधील तीन बँकाकडून ४ हजार ७६० कोटीचे कर्ज वसूल करण्यासाठी  या बँकांनी लंडनमधील न्यायालयात अंबानी यांच्या विरोधात खटला दाखल केला आहे. यावेळी अंबानी यांच्या वकीलाने न्यायालयाला सांगितले की, दूरसंपर्क सेवा बाजारपेठेतील विपरीत घडामोडींममुळे त्यांच्याकडे बँकांचे कर्ज फेडण्यासाठी पैसे नाहीत. त्यांच्या अशा परिस्थितीत त्यांचे कुटुंब देखील मदत करत नाही. मात्र नुकत्याच सुनावणीत अंबानी यांना कोर्टाने इशारा दिला आहे.

अंबानींच्या रिलायन्स इन्फ्रा कंपनीत दिल्ली सरकारचा ४९ टक्के हिस्सा आहे. तर बीएसईएस राजधानी पॉवर (BRPL) आणि बीएसईएस यमुना पॉवर (BYPL) या दोन कंपन्यांमध्ये ५१ टक्के हिस्सेदारी आहे. रिलायन्स इन्फ्रा आणि टाटा पॉवर या दोन कंपन्या दिल्लीतील ९३ टक्के ग्राहकांना वीज पुरवठा करतात.