रेल्वे रुळावर पोलिसांनी फेकलेला वजनकाटा उचलायला गेला आणि...; युवकाने गमावले दोन्ही पाय

Railway Accident : कारवाईदरम्यान पोलिसांच्या क्रुरतेचा चेहरा समोर आलाय. भाजी विकून कुटुंबाचे पोट भरणाऱ्या युवकाला दोन्ही पाय गमवावे लागलेत

Updated: Dec 3, 2022, 02:08 PM IST
रेल्वे रुळावर पोलिसांनी फेकलेला वजनकाटा उचलायला गेला आणि...; युवकाने गमावले दोन्ही पाय title=

Uttar Pradesh : उत्तर प्रदेश पोलिसांच्या क्रुरतेचा चेहरा समोर आलाय. एका भाजी विक्रेत्याला (vegetable seller) पोलिसांच्या कारवाईमुळे आपले दोन्ही पाय गमवावे लागले आहेत. उत्तर प्रदेशच्या कानपूरमधील कल्याणपूर परिसरात शुक्रवारी संध्याकाळी हा सर्व प्रकार घडलाय. पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे हा सर्व प्रकार झाल्याचे म्हटले जात आहे. अतिक्रमण हटवण्याच्या (Encroachment) नावाखाली पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे भाजी विक्रेत्याला रेल्वेची धडक बसून त्याचे दोन्ही पाय गमवावे लागले. हवालदार राकेश कुमार याच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडला. याप्रकरणी त्याला तात्काळ निलंबित करण्यात करण्यात आले आहे.

नेमकं प्रकरण काय?

उत्तर प्रदेश पोलीस कल्याणपूर परिसरातून अतिक्रमण हटवण्यासाठी गेले होते. इंदिरा नगर पोलीस चौकीतील अधिकारी आणि दोन शिपाई रेल्वे लाईन शेजारील भाजी विक्री करणाऱ्यांना तेथून उठवण्यासाठी गेले होते. यावेळी एका पोलिसाने अल्पवयीन भाजी विक्रेत्याचा वजनकाटा उचलून रेल्वे ट्रॅकवर फेकून दिला.

यानंतर तो मुलगा रेल्वे ट्रॅकवरुन वजनकाटा घेण्यासाठी गेला. तेव्हाच समोरून येत असलेल्या एका मेमो गाडीची त्याला धडक बसली. या धडकेत त्याला दोन्ही पाय गमवावे लागले. यानंतर तो ओरडू लागला. त्यानंतर मोठ्या प्रमाणात गर्दी होण्यास सुरुवात झाली. अनेकांनी याचा व्हिडीओ शूट करण्यास सुरुवात केली.

दरम्यान, प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, "तो मुलगा टोमॅटो विकत होता. राकेश नावाच्या हवालदाराने रेल्वे रुळावर त्याचा वजनकाटा फेकला. वजनकाटा घेण्यासाठी गेला असताना रेल्वेचे चाक त्याच्या अंगावर गेले."