Maharashtra Weather Forecast : वादळी पावसाचा मारा, त्यात घामाच्या धारा.... हवामान विभागाकडून चित्रविचित्र बदलांचा इशारा

Maharashtra Weather Forecast Today : एकिकडे देशात चक्रिवादळसदृश परिस्थितीमुळे पावसाची हजेरी असणार आहे, असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. तर, दुसरीकडे मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात मात्र हवामानाचा वेगळआ रंग पाहायला मिळेल असं सांगण्यात येत आहे.

सायली पाटील | Updated: May 5, 2023, 07:53 AM IST
Maharashtra Weather Forecast : वादळी पावसाचा मारा, त्यात घामाच्या धारा.... हवामान विभागाकडून चित्रविचित्र बदलांचा इशारा  title=
Maharashtra Weather forecast latest updates on rain predictions and temperature

Maharashtra Weather Forecast Today : मागील काही दिवसांपासून राज्यात आणि देशात हवामानात होणाऱ्या बदलांमुळं नागरिक आणि शेतकऱ्यांपुढे मोठ्या अडचणी वाढल्या. त्यातच क्षणात दाटून येणारे काळे ढग, क्षणात कोसळणारा अवकाळी पाऊस आणि एका क्षणात रणरणतं ऊन ही अशी परिस्थिती पाहता पुढच्या मिनिटाला नेमकं काय होईल हेच कळेना, अशीच काहीशी परिस्थिती. हवामान विभागाकडून मात्र यादरम्यान वेळोवेळी इशारा देत देशातील नागरिकांना येणाऱ्या दिवसांत नेमके हवामानाचे रंग कसे बदलतील याबाबतचा इशारा दिला आहे. यामध्ये येत्या दिवसांत चक्रिवादळासह वादशी पावसाचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.

वादळी पावसाच्या अंदाजामुळं राज्यातील काही भागाला याचा तडाखा बसेल, तर काही भागात मात्र ऊन- पावसाचा खेळ सुरु राहील. पुढच्या 24 तासांच ढगाळ वातावरणासोबतच तापमानात उष्णतेचा दाह जाणवेल. परभणी, जालना येथे गुरुवारी झालेल्या पावसानंतर तापमानात काही अंशांची वाढ नोंदवण्यात येईल. तर, सोलापुरातही तापमान वाढल्याची नोंद करण्यात येईल.

कोकण आणि विदर्भात पाऊस...

शुक्रवार आणि शनिवारी कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरुपाती सरी बरसतील. तर, ताशी 30 ते 40 किमी वेगानं वागळी वारे वाहतील. काही भागांत ढगांच्या गडगडाटासह पावसाची हजेरी पाहायला मिळेल.

हेसुद्धा वाचा : आताची सर्वात मोठी बातमी! पुण्यातील DRDO चा संचालक पाकिस्तानच्या हनीट्रॅपमध्ये, ATS कडून अटक

तापमानात काही अंशांनी वाढ होणार असली तरीही राज्यात अद्यापही कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागाला हवामान विभागाकडून यलो अलर्ट देण्यात आला आहे.

देशातील हवामानाची काय स्थिती?

तिथे मोचा नावाच्या चक्रिवादळामुळं ओडिशामध्ये यंत्रणा सतर्क असतानाच आता बंगालच्या उपसागरातील आग्नेयेला पुन्हा एकदा चक्राकार वाऱ्याची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. ज्यामुळं पुढील तीन दिवसांमध्ये कमी दाबाचं क्षेत्रही निर्माण होऊ शकतं. चक्रीवादळ सदृश ही परिस्थिती देशाच्या उत्तरेकडे सरसावू शकते.

हवामान अभ्यासक/ तज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी चक्रिवादळासंदर्भातील एक माहितीपर ट्विट करत अतिशय महत्त्वाची बाब लक्षात आणली. 1965 ते 2020 या काळात बंगालच्या उपसागरात जवळपास 214 चक्रिवादळांची निर्मिती झाली. मे महिन्यात मान्सूनची वाटचाल सुरु होण्यापूर्वी चक्रिवादळांनी निर्मिती तुनेनं जास्त होते असं त्यांनी ट्विटमध्ये नमूद केलं. जिथं त्यांनी एक नकाशाही उदाहरणाह शेअर केला.

दरम्यान, देशात रविवारपासून तापमान वाढीस सुरुवात होणार असून, उत्तरेकडील जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांमध्ये मात्र काही भागांना हिमवृष्टीचा तडाखा बसणार आहे. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून पावसाचं प्रमाण देशभरात कमी होणार असून त्यानंतरच तापमानात वाढ नोंदवली जाईल जी सातत्यानं पुढचे काही दिवस टिकून असेल.