राज्याचे CM हे भाजपचे मुख्यमंत्री, सर्वांचे मुखवटे आता गळून पडले - संजय राऊत

Shiv Sena Crisis​ : राज्याचे मुख्यमंत्री हे दिल्ली गेलेत, ते भाजपचे मुख्यमंत्री. कारण त्यांचे हायकमांड दिल्लीत आहे आहेत, अशी जोरदार टीका शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी केली आहे. (Shivsena criticised  CM Eknath Shinde's Delhi Tour)

Updated: Jul 9, 2022, 01:09 PM IST
राज्याचे CM हे भाजपचे मुख्यमंत्री, सर्वांचे मुखवटे आता गळून पडले - संजय राऊत title=

नाशिक : Shiv Sena Crisis : राज्याचे मुख्यमंत्री हे दिल्ली गेलेत, ते भाजपचे मुख्यमंत्री. कारण त्यांचे हायकमांड दिल्लीत आहे आहेत. शिवसेनेचे हायकमांड हे मुंबईत आहे. ते मंत्रिमंडळ ठरवण्यासाठी दिल्लीत आहे, सर्वांचे मुखवटे आता गळून पडले आहेत, अशी जोरदार टीका शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी केली आहे. (Shivsena criticised  CM Eknath Shinde's Delhi Tour)

 यावेळी राऊत यांनी बेळगाव सीमाभाग वाद प्रश्नावर जोर दिला. मुख्यमंत्री दिल्लीत आहेत. बेळगाव प्रश्न आहे तोपर्यंत तो भाग केंद्रशासित व्हावा, अशी मागणी मोदींकडे करत तसा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेऊन यावा, असे आवाहन केले. बेळगावचे शिष्टमंडळ भेटले, त्यांनी सांगितले की तेथे मराठी लोकांना त्रास होत आहे आहे. तसेच राष्ट्रपती पदाचे उमेदवार आदिवासी आहेत, त्यामुळे अनेक आदिवासी खासदारांना वाटते की त्यांना पाठिंबा द्यावा, असे ते म्हणाले.

शिवसेनेकडून सातत्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटावर हल्लाबोल करण्यात येत आहे. शिवसेनेकडून खासदार संजय राऊत, माजी मंत्री आदित्य ठाकरे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दररोज हल्लाबोल करत आहेत. आज पुन्हा राऊत यांनी नाशिक येथे हल्लाबोल केला आहे. दरम्यान, शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'च्या अग्रलेखातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या दिल्ली दौऱ्यावर शिवेसनेने टीका केली आहे. 

मुंबईचे महत्त्व कमी करण्याची एकही संधी दिल्लीकरांकडून सोडली जात नाही. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला आहेत. आपल्या गटासाठी मंत्रीपदी अधिक मिळविण्यासाठी हा दौरा असेल तर काही बोलायला नको. मात्र इतर बाबतीत भाजपच्या 'हो'ला 'हो' केलंत तर मुंबई हातची जाईल, तसेच महाराष्ट्राचे तीन तुकडे करण्याचे भाजपचे मनसुबे तडीस जातील. तेव्हा शिंदे गट काय करणार असा सवालही 'सामना'तून उपस्थित करण्यात आला.

'शिवसेनेत फूट पाडून व मराठी माणसांची ऐक्याची वज्रमूठ फोडून शिंदे हे दिल्लीस जात आहेत. मुंबईवरील मराठी माणसांचा पगडा कमी होईल आणि दिल्लीला नेमके तेच हवे आहे. मात्र जाताना त्यांनी महाराष्ट्रहिताचा कोणता कार्यक्रम पंतप्रधानांच्या समोर ठेवण्यासाठी नेला ते स्पष्ट केले पाहिजे', अशी मागणी सामनातून करण्यात आली.