Maharashtra MLA Disqualification: बंडखोरी केली 40 आमदारांनी मग शिंदे गटाच्या 16 आमदारांच्याच अपात्रतेचा वाद का?

SC Hearing on Maharashtra MLA Disqualification: एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमधील आमदारांनी 2022 साली जून महिन्यामध्ये बंडखोरी केली आणि ते सुरतला गेले. त्यानंतरच्या सत्तानाट्यामध्ये महाविकास आघाडी सरकार कोसळलं. 

स्वप्निल घंगाळे | Updated: May 11, 2023, 10:48 AM IST
Maharashtra MLA Disqualification: बंडखोरी केली 40 आमदारांनी मग शिंदे गटाच्या 16 आमदारांच्याच अपात्रतेचा वाद का? title=
Maharashtra MLA Disqualification Case

SC Hearing on Maharashtra MLA Disqualification: शिवसेनेमध्ये बंडखोरी करुन राज्यातील महाविकास आघाडी सरकार उलथवून टाकणारा एकनाथ शिंदे गट (Eknath Shinde) आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या गटातील न्यायालयीन लढ्याचा आज निकाल लागणार आहे. सर्वोच्च न्यायालय मागील काही महिन्यांपासून सुरु असलेल्या या प्रकरणाच्या निकालाचं वाचन आजपासून सुरु करणार असून सर्वात आधी 16 आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणावर निकाल दिला जाणार आहे. 16 आमदार पात्र की अपात्र यासंदर्भातील निकाल कोर्टाकडून दिला जाणार असल्याने हे आमदार अपात्र ठरले तर सरकार पडणार की बहुमताच्या जोरावर कायम राहणार यासंदर्भात वेगवेगळे दावे केले जात आहे. मात्र असं असतानाच दुसरीकडे शिंदेंबरोबर बंडखोरी करणाऱ्या आमदारांची संख्या 40 असली तरी 16 आमदारच अपात्र कसे ठरणार याबद्दलही अनेकांच्या मनात संभ्रम आहे. याचसंदर्भात जाणून घेऊयात...

16 आमदाराच का?

महाविकास आघाडी सरकारमध्ये नगरविकास मंत्री असलेल्या शिंदेंनी जून 2022 मध्ये आपल्यास सरकारविरोधात बंड केलं तेव्हा त्यांच्याबरोबर सुरुवातीला 16 आमदार होते. शिंदेंसहीत हे 16 आमदार सुरतला गेले होते. यानंतर मूळ शिवसेनेनं या बंडखोरीनंतर या आमदारांना नोटीस बजावली होती. या नोटीशीला 48 तासांमध्ये उत्तर द्यावे नाहीतर तुम्हाला अपात्र ठरवलं जाईल असं या नोटीसमध्ये म्हटलं होतं. या नोटीसविरोधात शिंदे गटाने थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. यानंतर गुवहाटीला गेलेल्या शिंदे गटामध्ये मूळ शिवसेनेतील 40 आमदार मिळाले. 

इतर 24 आमदार नंतर शिंदेच्या बाजूने गेले

त्यामुळेच आज ज्या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालय निकाल देणार आहे तो या अपात्रतेची नोटीस पाठवण्यात आलेल्या 16 आमदारांबद्दलच्या प्रकरणात देणार आहे. नोटीसमध्ये सुरतला गेलेल्या आमदारांना नोटीस पाठवली होती. ज्यामध्ये नंतर शिंदे गटात सहभागी झालेल्या 24 आमदारांचा समावेश नव्हता. म्हणूनच बंडखोरी करुन भाजपाबरोबर सत्ता स्थापन करणाऱ्या बंडखोर आमदारांची संख्या 40 असली तरी अपात्रतेच्या कारवाईमध्ये 16 आमदारांचं नावं आहे.

नक्की वाचा >> निकालाआधीची मोठी Update! राजभवनाकडे उद्धव ठाकरेंचा राजीनाम्याची प्रतच नाही? RTI उत्तराची प्रत Viral

16 आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणाची मागील 6 महिन्यांहून अधिक काळापासून न्यायालयीन लढाई सुरु आहे. सुप्रीम कोर्टाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर आज घटनापीठाच्या माध्यमातून निकालाचं वाचन केलं जाणार आहे. त्यामुळेच आता हे 16 आमदार पात्र ठरतात की अपात्र आणि हा निर्णय नेमका कोण घेणार हे आजच्या निकालानंतर स्पष्ट होईल.

नक्की वाचा >> सुप्रीम कोर्टाच्या निकालाआधी संजय राऊतांना का आठवला 'काय झाडी, काय डोंगर..' डायलॉग? 

अपात्रतेची टांगती तलवार असलेले आमदार कोणते

एकनाथ शिंदे, भरत गोगावले, लता सोनावणे, रमेश बोरणारे, प्रकाश सुर्वे, बालाजी किणीकर, संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार, तानाजी सावंत, संजय शिरसाट, यामिनी जाधव, चिमणराव पाटील, संजय रायमुलकर, बालाजी कल्याणकर, महेश शिंदे, अनिल बाबर.