शिवसेनेकडून 'बातमी' लिक झाल्यामुळे काँग्रेसमध्ये नाराजी

विधानपरिषद निवडणुकीआधी महाविकासआघाडीमध्ये नाराजीनाट्य 

Updated: May 10, 2020, 04:31 PM IST
शिवसेनेकडून 'बातमी' लिक झाल्यामुळे काँग्रेसमध्ये नाराजी title=

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : विधानपरिषद निवडणुकीआधी महाविकासआघाडीमध्ये नाराजीनाट्य बघायला मिळत आहे. शिवसेनेकडून माहिती लिक केल्यामुळे काँग्रेसच्या गोटात नाराजी आहे. संध्याकाळपर्यंत याबाबत तोडगा काढण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून केला जाणार आहे. काँग्रेस जर २ जागा लढवणार असेल, तर आपण निवडणूक लढणार नाही, असा इशाारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काँग्रेस नेत्यांना दिला होता. उद्धव ठाकरेंच्या या इशाऱ्याची बातमी शिवसेना नेत्यांकडून लिक करण्यात आल्यामुळे काँग्रेसमध्ये अस्वस्थता आहे.

विधानपरिषद निवडणुकीच्या ९ जागांसाठी भाजपने ४, काँग्रेसने २ आणि राष्ट्रवादीने २ उमेदवारांची घोषणा केली आहे, तर शिवसेना २ उमेदवार रिंगणात उतरवणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उमेदवार असल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे. पण काँग्रेस दोन जागा लढण्यावर ठाम आहे. काँग्रेसने २ उमेदवारांची घोषणा केल्यामुळे महाविकासआघाडीमध्ये चिंतेचं वातावरण आहे.

'महाविकासआघाडीचे ६ उमेदवार आहेत, त्यात काँग्रेसचे २ आहेत. माझ्यावर कोणताही दबाव नाही. ६ उमेदवार निवडून कसे येणार याचे नियोजन सुरू आहे', अशी प्रतिक्रिया बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.

मुख्यमंत्री रिंगणात तरीही विधानपरिषद निवडणूक बिनविरोध नाही, धोका कोणाला?

कोण आहेत उमेदवार?

भाजप- प्रविण दटके, गोपीचंद पडळकर, अजित गोपछडे, रणजितसिंह मोहिते पाटील

काँग्रेस- बीड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष राजकिशोर उर्फ पापा मोदी आणि  प्रदेश काँग्रेसचे सचिव राजेश राठोड

राष्ट्रवादी काँग्रेस-  शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी

विधानपरिषदेसाठी शिवसेनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नीलम गोऱ्हे यांचं नाव निश्चित केलं असलं, तरी याची अधिकृत घोषणा झालेली नाही. भाजपने  या चौघांना विधानपरिषदेची उमेदवारी दिली आहे.

१४ मे ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. कोणत्याच उमेदवाराने अर्ज मागे घेतला नाही, तर २१ मे रोजी विधानपरिषदेसाठी निवडणूक होईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आमदार करण्यासाठी विधानपरिषदेची ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे.