जेव्हा तुमच्या बसमध्ये होम क्वारंटाइन स्टॅम्प असलेला व्यक्ती शिरतो ....

नागरिकांनी नेमकं काय करायला हवं? 

Updated: Mar 27, 2020, 04:28 PM IST
जेव्हा तुमच्या बसमध्ये होम क्वारंटाइन स्टॅम्प असलेला व्यक्ती शिरतो .... title=

दोन मिनिटांत कंडक्टरच्या लक्षात येतं... चाच्या क्यूँ निकले आप घरसें बाहर? घरपर क्यों नहीं रुके?  तो त्याला खाली उतरवतो  आणि कंट्रोल ऑफिस ला फोन करून कळवतो. मग सगळं पब्लिक विंचू चावल्यासारखं पॅनिक होतं.  शेवटी कंडक्टरला शांत केलं आणि पब्लिकला समजावून सांगितलं. त्याला सॅनिटायझर दिला. अगदी प्रसाद मिळाल्यासारखं त्याने ते हाताला चोळलं. त्या जागेवर कुणाला बसू देवू नका एवढंच करा एवढीच ताकीद दिली आणि माझा स्टॉप आल्यावर मी उतरले पण  मनात प्रश्नाचं काहूर मात्र थांबलं नाही. ती व्यक्ती होम क्वारंटाईन असताना घराच्या बाहेर का पडली? यात चूक कुणाची? शासनाची तर नक्कीच नाही.

शासन आपलं कर्तव्य चोख बजावतये पण आपण  आपले नागरी कर्तव्य पळतोय का?  शासन एकट कुठं कुठं पुरणार? गल्ली बोळात मोहल्ल्यात भटकणाऱ्या टवाळखोर (शब्द वापरू शकत नाही) सौम्य शब्दात  कार्ट्याना कोण आटोक्यात आणणार? गल्ली बोळात बायका कधी न एकत्र आल्यासारखं गप्पा मारत बसलेल्या असतात. पब्लिक कधी भाज्या पाहिल्या, किराणा विकत घेतला नाही असं करतात. 

आपण आपलं नागरी कर्तव्य कधी बजावणार आहोत? मग आपण देशभक्त असल्याचा आव का आणावा?  फक्त शासन, डॉक्टर, नर्स, पोलिस, सफाई कामगार, बेस्ट, बँक कर्मचारी एवढे मूठभर लोक मिळून ही लढाई लढू शकत नाही हे पब्लिक ला कधी कळणार? मिलिटरी आणायची गरज का पडू द्यावी ? त्यांनी  देशाच्या सीमा सांभाळाव्या की पब्लिकला वळाववं? आपण शिकलेले आहोत पण सुशिक्षित आहोत का?आपण जबाबदार होणार आहोत की आपल्या जवळच कुणी गेल्याशिवाय आपल्याला फरक पडणार नाहीये? 

नोट - सदर ब्लॉग डॉ मोनाली चोपडे,मुंबई महानगरपालिका यांनी लिहिलेला आहे.