विधेयक मंजूर, लागा निवडणुकीच्या तयारीला...

विरोधकांचा इशारा धुडकावून लावत विधेयक मंजूर 

Updated: Dec 28, 2021, 06:40 PM IST
विधेयक मंजूर, लागा निवडणुकीच्या तयारीला... title=

मुंबई : हे विधेयक मंजूर केल्यास आम्ही न्यायालयात जाऊ असा इशारा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी दिला. मात्र, त्यांचा इशारा धुडकावून लावत बहुमताच्या जोरावर सत्ताधाऱ्यांनी विधानसभेत आज एक महत्वाचे विधेयक मंजूर करून घेतलं.

पुढच्या वर्षी म्हणजे 2022 मध्ये मुंबई महानगरपालिकेची निवडणूक (BMC Election 2022) होणार आहे. या निवडणुकीत मुंबई महापालिकेत (BMC) नगरसवेकांच्या संख्येत वाढ होणार आहे. मुंबई मनपातील 9 प्रभाग वाढवण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला. याबाबतचे विधेयक आज विधिमंडळात मंजुरीसाठी आले.

या विधेयकाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विरोध केला. महापालिकेच्या वॉर्डची फेररचना करताना भाजपचे नगरसेवक असलेल्या ४२ नगरसेवकांच्या वॉर्डची पुनर्रचना केली. वेडेवाकडे वॉर्ड तयार केले. आम्ही ही चूक निवडणूक आयोगाच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर निवडणूक आयोगाने हा प्रस्ताव परत पाठवला.

२०११ च्या जनगणनेप्रमाणे वॉर्डची पुनर्रचना झाली आहे. त्यामुळे आता पुनर्रचनेची गरज नाही. हा निर्णय शुद्ध हेतूने घेतलेला नाही. आम्ही याविरोधात गरज पडल्यास न्यायालयात जाऊ, असा इशारा फडणवीस यांनी दिला.

त्याला उत्तर देताना नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी अध्यादेशाला कोर्टाने स्थगिती दिलेली नाही. वॉर्ड रचना करून निवडणूक आयोगाकडे दिल्यानंतर निवडणूक आयोग अंतिम निर्णय घेतो. तसेच यावर हरकती आणि सूचना मागवण्यात आल्याचे स्पष्ट केले. यानंतर हे विधेयक बहुमताने मंजूर करण्यात आले.

हे विधेयक मंजूर झालयामुळे मुंबईतील प्रभागांची संख्या वाढविण्याच्या निर्णयाचा मार्ग मोकळा झाला आहे. 2001 नंतर लोकसंख्येत झालेली वाढ, वाढलेलं नागरीकरण यामुळे नगरसेवकांच्या संख्येत वाढ करणे गरजेचे होतं,  वाढलेल्या मतदारांच्या संख्येनुसार प्रभाग संख्या वाढवली आहे अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.

20 वर्षानंतर ही वाढ करण्याची आवश्यकता होती, त्यानुसार 9 प्रभाग वाढवले आहेत. आता 227 वरून 236 प्रभाग करण्यात आले आहेत.  मूलभूत सुविधा देण्यासाठी योग्य व्हावे म्हणून हा निर्णय घेतल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.