सीबीआय प्रमुखांचं `युपीए`बद्दल खळबळजनक वक्तव्य

केंद्रीय अन्वेषण विभागानं गुरूवारी इशरत जहाँ बनावट चकमकप्रकरणी पुरवणी आरोपपत्र न्यायालयात सादर केले. त्यात भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आणि त्यांचे उजवे हात मानले जाणारेअमित शहा यांच्यावर आरोप केले असते तर युपीए सरकारला आनंद झाला असता, असं खळबळजनक वक्तव्य सीबीआय प्रमुख रणजीत सिन्हा यांनी केलंय.

Updated: Feb 8, 2014, 03:33 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
केंद्रीय अन्वेषण विभागानं गुरूवारी इशरत जहाँ बनावट चकमकप्रकरणी पुरवणी आरोपपत्र न्यायालयात सादर केले. त्यात भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आणि त्यांचे उजवे हात मानले जाणारे अमित शहा यांच्यावर आरोप केले असते तर युपीए सरकारला आनंद झाला असता, असं खळबळजनक वक्तव्य सीबीआय प्रमुख रणजीत सिन्हा यांनी केलंय.
"अमित शहांविरूद्ध आम्हाला कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत. त्यामुळे आम्ही मिळालेल्या पुराव्यांनुसार आरोपपत्र तयार केले आहे. राजकीय इच्छेनुसार आम्ही अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्यावर आरोप ठेवले असते, तर केंद्रातील युपीए सरकारला आनंद झाला असता", असं मनोगत सिन्हा यांनी याप्रकरणी व्यक्त केलं. त्यामुळे पुरवणी आरोपपत्रात अमित शहांच्या नावाचा उल्लेख नाही. मात्र या पुरवणी आरोपपत्रात गुप्तचर विभागाचे(आयबी) विशेष संचालक राजेंद्र कुमार यांना मुख्य आरोपी बनविण्यात आले आहे.
केंद्रीय अन्वेषण विभागाच्या प्रमुखानं केलेल्या वक्तव्यामुळं प्रस्थापित राजकारणामध्ये वादळ निर्माण झाले आहे. याप्रकरणी तीव्र स्वरूपाच्या राजकीय प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या आहेत. यापूर्वी सीबीआय म्हणजे सत्ताधाऱ्यांचा बोलका पोपट असल्याची रूपकं वापरण्यात येत होती. आता या प्रकरणी चागंलच वाक् यु्द्ध रंगलयं. पोपट वेडा झालाय अस जदयूनं म्हटलंय तर पहिल्यांदाच पोपटाने योग्य कार्ड काढलंय अशी भाजपची प्रतिक्रिया आहे.
सीबीआय प्रमुख रणजीत सिन्हा यांच्यामते मीडियाने आपल्या विधानाचा विपर्यास केला आहे, आपण फक्त सीबीआय ही नि:पक्ष संस्था आहे, कोणताही राजकिय दबावाखाली सीबीआय काम करत नाही, हेच आपल्याला निदर्शनास आणून द्यायचं होतं, अशी सारवासारव रणजीत सिन्हा यांनी केली.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.