श्रीरामाच्या नावाने भाजपने पाणी विकलं, विटा विकल्या; जितेंद्र आव्हाडांची टीका

श्रीराम कोणाच्या सातबाऱ्यावर नाही, तो सातबारा कोणाच्या मालकीचा नाही. 

Updated: Aug 2, 2020, 03:00 PM IST
श्रीरामाच्या नावाने भाजपने पाणी विकलं, विटा विकल्या; जितेंद्र आव्हाडांची टीका title=

नाशिक: अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनाचा मुहूर्त जसा जवळजवळ येत चालला आहे तसतसे देशातील राजकीय वातावरण तापत आहे. या सोहळ्यासाठी मोदी सरकारने मोजक्याच लोकांना आमंत्रित केले आहे. यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा समावेश नाही. त्यामुळे सध्या राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक युद्ध रंगले आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भाजपवर चांगलीच आगपाखड केली. त्यांनी म्हटले की, श्रीराम कोणाच्या सातबाऱ्यावर नाही, तो सातबारा कोणाच्या मालकीचा नाही. रामाच्या नावे राजकारण करणं वेगळं आणि भक्ती वेगळी, असा टोला आव्हाड यांनी भाजपला लगावला. 

'राम मंदिरासाठी मोदींचे नव्हे उलट राजीव गांधींचे योगदान मोठे'

नाशिकच्या सिडको परिसरात रविवारी जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावे सुरु करण्यात आलेल्या कोविड रुग्णालयाचे उद्घाटन झाले. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना भाजपवर जोरदार टीका केली. रामाच्या नावावर राजकारण करणे वेगळे आणि भक्ती वेगळी असते.  गेली ४० वर्ष भाजपने रामाच्या नावावर राजकारण केलं, हे अख्ख्या जगाला  माहिती आहे. राम नाव घेऊन त्यांनी पाणी विकलं, विटा विकल्या. सत्ता मिळवण्यासाठी जे जे करता येईल ते त्यांनी रामाच्या नावावर केले, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली.

राम मंदिरामुळे कोरोना आटोक्यात येणार आहे का? शरद पवारांचा मोदींना खोचक टोला

येत्या ५ ऑगस्टला अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे भूमिपूजन होणार आहे. सध्या अयोध्येत या सोहळ्याची जोरदार तयारी सुरु आहे. परंतु, ऐन कोरोनाच्या संकटात भूमिपूजन सोहळा आयोजित केल्यामुळे विरोधकांकडून मोदी सरकारला लक्ष्य केले जात आहे.