कंगना म्हणजे भाजप आयटी सेल, काँग्रेसचा आरोप

 देवेंद्र फडणवीसांनी राज्याची माफी मागावी

Updated: Sep 4, 2020, 09:55 AM IST
कंगना म्हणजे भाजप आयटी सेल, काँग्रेसचा आरोप title=

मुंबई : 'कंगना म्हणजे भाजप आयटी सेल' अशी टीका काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केली आहे. कंगनाने मुंबईबद्दल जे वक्तव्य केलं त्यामुळे तिच्यावर आता बॉलिवूड पाठोपाठ राजकीय वर्तुळातूनही टीका होत आहे. काँग्रेसचे सचिन सावंत यांनी कंगनावर टीका करत देवेंद्र फडणवीसांनी राज्याची माफी मागावी अशी टीका देखील केली आहे. 

विवेक मोईत्रा यांच्यापासून राम कदम यांना ड्रग विक्री पुरवठ्याबाबत माहिती आहे. त्यांचे बॉलिवूड संबंधही घनिष्ठ आहेत. त्यामुळे त्यांची नार्को टेस्ट करावी अशी मागणी सचिन सावंत यांनी केली आहे. कंगनाच्या साथीने भाजपने १०६ हुतात्म्यांचा घोर अपमान केलाय अशी टीका सावंत यांनी केलीय. देवेंद्र फडणवीसांनी यासाठी राज्याची माफी मागावी अशी टीका सावंत यांनी केली आहे. 

राम कदम यांनी गुरुवारी ट्विट करून म्हटले की, सुशांत सिंह राजपूत प्रकरणात शिवसेनेतील एका बड्या नेत्याने पुन्हा एकदा कंगना राणौतला धमकावण्याचे दु:साहस केले आहे. कंगना राणौतने मुंबईत येऊ नये, असे शिवसेनेच्या नेत्यांनी म्हटले. मात्र, कंगना राणौत मुंबईत आल्यास महाराष्ट्र सरकारला भीती वाटण्याचे कारण काय? कंगना ही सुशांत सिंह राजपूत प्रकरणात गुंतलेले राजकारणी, नेते, अभिनेते अशा सगळ्यांचा पर्दाफाश करायला तयार आहे. तिच्या या साहसाचे स्वागत करण्याऐवजी महाराष्ट्र सरकार तिला धमकी देत आहे, असे कदम यांनी म्हटले.

 कंगना राणौतच्या मुखातून ही नावे निघाल्यास महाराष्ट्र सरकारच अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांकडून तिला धमकी दिली जात आहे. परंतु, कंगना राणौतही झाशीची राणी आहे. ती शिवसेना नेत्यांच्या अशा पोकळ धमक्यांना घाबरणार नाही, असे राम कदम यांनी म्हटले.