भय्यू महाराजांच्या अंत्ययात्रेला सुरुवात

भैय्यू महाराजांचं पार्थिव इंदूरमधल्या सूर्योदय आश्रमात आणण्यात आलंय.

Updated: Jun 13, 2018, 02:32 PM IST

इंदूर : भैय्यू महाराजांचं पार्थिव इंदूरमधल्या सूर्योदय आश्रमात आणण्यात आलंय. दीडच्या सुमाराला अंत्ययात्रेला सुरुवात झाली. सयाजी चौकातल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. भैय्यू महाराजांनी मंगळवारी दुपारी पिस्तुलानं स्वत:च्या मस्तकात गोळी झाडून आत्महत्या केली. काल रात्रभर त्यांचं पार्थिव इंदूरच्या बॉम्बे रुग्णालयात ठेवण्यात आलं होतं.   

भैय्यू महाराजांचे राजकीय संबंध बघता अनेक अतिमहत्वाच्या व्यक्ती इंदूरमध्ये येण्याची शक्यता आहे. भैय्यू महाराजांचे सर्वपक्षीयांची अगदी जवळचे संबंध होते. पण तसे काहीही घडलेले नाही. 

या व्यक्तीकडे दिली जबाबदारी

माझ्या सर्व आश्रम व त्याच्या संबंधित गोष्टींचे सर्व व्यवहार हे माझा सेवक विनायककडे द्या. माझ्यानंतर तोच हे सर्व व्यवहार योग्य प्रकारे सांभाळू शकेल, असे भय्यूजी महाराज यांनी त्यांच्या सुसाईड नोटच्या दुसऱ्या पानावर लिहले आहे.

कौटुंबिक कलहाच्या चर्चेला उधाण

आत्महत्या ही कौटुंबिक कलहातून केल्याचे बोलले जात असताना आपले सर्व व्यवहार सेवकाकडे देऊन या चर्चेला आणखीनच तोंड फुटत आहे. भय्यू महाराजांनी सर्व व्यवहार कुटुंबाकडे सुपूर्त न करता सेवकाकडे देण्याचा निर्णय का घेतला? हा प्रश्न उपस्थित होत आहे.