75 मिनिटं.... भारत- पाकिस्तानमध्ये असं काय घडलं की, देशांच्या सीमेवर घ्यावी लागली उच्चस्तरीय बैठक?

India Pakistan Flag Meeting: LoC सारख्या अतिसंवेदनशील क्षेत्रात झाली उच्चस्तरीय बैठक. दोन्ही देशांमध्ये नेमकी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली? आंतरराष्ट्रीय विश्वात एकच चर्चा...

सायली पाटील | Updated: Feb 21, 2025, 06:33 PM IST
75 मिनिटं.... भारत- पाकिस्तानमध्ये असं काय घडलं की, देशांच्या सीमेवर घ्यावी लागली उच्चस्तरीय बैठक?
India Pakistan Flag Meeting at jammu and Kashmir poonch sector latest update and all details inside

India Pakistan Flag Meeting: भारत आणि पाकिस्तान या दोन्ही राष्ट्रांमधील तणाव कधीही दुर्लक्षित राहिला नाही. सीमा क्षेत्रामध्ये या दोन्ही देशांमध्ये सुरू असणारा संघर्ष मागील काही वर्षांमध्ये गंभीर स्वरुप धारण करताना दिसला. ज्यानंतर दोन्ही देशांमध्ये उच्चस्तरीय बैठकामची सत्रही सुरू झाली. याचदरम्यान आणख एक महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली असून, जम्मू काश्मीरमधील नियंत्रण रेषा क्षेत्रानजीक तणाव वाढलेला असतानाच भारत आणि पाकिस्तान या दोन्ही राष्ट्रांमध्ये एक फ्लॅग मिटींग पार पडली.

शुक्रवारी ही उच्चस्तरिय बैठक पार पडली असून, यामध्ये दोन्ही देशांच्या लष्कराचे वरिष्ठ अधिकारी (ब्रिगेडियर रँक) यांचा सहभाग होता. पुंछ  सेक्टरमधील चाका दा बाग इथं ही बैठक साधारण 75 मिनिटं ही बैठक पार पडली. मागील दोन वर्षांनंतर पहिल्यांदाच ही बैठक पार पडली असून, यापूर्वीची बैठक 2021 मध्ये पार पडली होती. त्यामुळं यावेळी झालेल्या या बैठकीमध्ये नेमकं काय घडलं याची चर्चा जागतिक स्तरावरही पाहायला मिळत आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ‘चक्कन-दा-बाग क्रॉसिंग पॉइंट’ इथं पार पडलेल्या या 75 मिनटांच्या या फ्लॅग मिटिंगमध्ये पार पडलेल्या या बैठकीमध्ये दोन्ही पक्षांच्या वतीनं सीमा क्षेत्रात शांतता प्रस्थापित करण्यावर भर दिला. सोबतच दोन्ही देशांकडून संघर्षविरामाचा आदर करण्यावर लक्ष केंद्रीत करण्यात आलं. लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे 25 फेब्रुवारी 2021 ला पाकिस्तानकडून संघर्षविरामाचं नुतनीकरण करण्यात आलं. ज्यानंतर जम्मू काश्मीर प्रांतातील अप्रिय घटनांमध्ये घट झाल्याचं म्हटलं गेलं.

हेसुद्धा वाचा : ...तर कितीही जीवतोड काम करुनही ग्रॅच्युइटी मिळणार नाही; SC च्या निर्णयानं नोकरदारांना धक्का

यंदाच्या वर्षी मात्र फेब्रुवारी महिन्यात हा तणाव वाढताना दिसला. 4-5 फेब्रुवारी रोजी पुंछमधील कृष्णा सेक्टर इथं एलओसीपलिकडे भारतीय सीमा क्षेत्रात शेजारी राष्ट्राकडून सातत्यानं घुसखोरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला, ज्यानंतर 8 फेब्रुवारी रोजी राजौरीच्या केरी सेक्टरमधील नियंत्रण रेषेनजीकसुद्धा गोळीबार झाल्याची बाब निदर्शनास आली. यानंतरही या घटना थांबण्याचं नाव घेत नव्हत्या. 10 आणि 11 फेब्रुवारीलासुद्धा या अप्रिय घटनांनी लष्कराच्या डोकेदुखीत भर टाकली आणि या तणावानं डोकं वर काढलं.

सध्याच्या घडीला जम्मू काश्मीर प्रांतामध्ये भारतीय लष्करानं अनेक भागांमध्ये गस्त वाढवली असून, बर्फवृष्टी कमी झाल्यानं सीमेपलिकडून होणाऱ्या घुसखोरीसाठीच्या अनेक वाटा खुल्या असल्यामुळं हा निर्णय घेण्यात आल्याचं म्हटलं जात आहे.