Shatrughan Sinha on non veg: ज्येष्ठ अभिनेते आणि अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसचे खासदार शत्रुघ्न सिन्हा हे त्यांच्या विधानांमुळे नेहमीच चर्चेत असतात. मंगळवारी संसदेबाहेर माध्यमांशी बोलताना बॉलिवूडच्या 'शॉटगन'ने भारतात मांसाहारावर पूर्णपणे बंदी घालण्याची मागणी केली होती. उत्तराखंडमध्ये समान नागरी संहिता (UCC) च्या अंमलबजावणीचे कौतुक करताना देशभरात कायद्याच्या अंमलबजावणीतील गुंतागुंती देखील त्यांनी अधोरेखित केल्या. हे स्पष्ट करताना त्यांनी नॉनव्हेज बंदीवर भाष्य केले आणि देशभरातील तमाम नॉन व्हेज प्रेमींची नाराजी ओढवून घेतली. या विधानानंतर खासदार शत्रुघ्न सिन्हा यांना सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केले जात आहे.
शत्रुघ्न सिन्हा बऱ्याच काळापासून चित्रपटांपासून दूर आहेत. पण ते आजही त्यांच्या जुन्या चित्रपटांमुळे, त्यांच्या भाषणामुळे प्रसिद्धीच्या झोतात असतात. त्यांनी चित्रपटांपासून स्वतःला दूर केले आणि राजकारणाचा मार्ग स्वीकारला. शत्रुघ्न हे अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसचे खासदार आहेत. अलीकडेच त्यांनी मांसाहारावर बंदी घालण्याची मागणी केली होती. ज्यासाठी लोक त्यांच्यावर खूप टीका करत आहेत. शत्रुघ्न सिन्हा यांनी यूसीसीला पाठिंबा देत असे म्हटले की, प्रादेशिक असमानतेमुळे देशभरात यूसीसी कायद्याच्या अंमलबजावणीत आव्हाने निर्माण होऊ शकतात. देशाच्या अनेक भागात गोमांसावर बंदी घालण्यात आली आहे. केवळ गोमांसच नाही तर सर्वसाधारणपणे मांसाहारी पदार्थांवरही बंदी घातली पाहिजे. ईशान्येकडील भागात गोमांस खाणे अजूनही कायदेशीर असल्याचे त्यांनी सांगितले.
#WATCH | On Gujarat Government to introduce Uniform Civil Code after Uttarakhand Government, TMC MP Shatrughan Sinha says, "Implementation of UCC in Uttarakhand, is prima facie, commendable. UCC must be there in the country and I am sure everyone will agree with me. But there are… pic.twitter.com/9jWW0VhQkU
— ANI (@ANI) February 4, 2025
'जर तुम्ही तिथे खाल्ले तर ते यम्मी असते पण जर तुम्ही आमच्या उत्तर भारतात खाल्ले तर ते मम्मी असते', असे विधान करत त्यांनी एक छोटासा विनोदही केला. शत्रुघ्न सिन्हा यांचे विधान समोर येताच नेटिझन्सनी त्यांना ट्रोल करायला सुरुवात केली आहे. मांसाहारी अन्नाचा यूसीसीशी काय संबंध आहे? असे एका यूजर्सने विचारले. तर 'यूसीसी हे खाण्याच्या सवयींबद्दल नाही... ते लग्न आणि मालमत्तेच्या अधिकारांबद्दल आहे.' असे दुसऱ्याने कमेंटमध्ये लिहिले. 'मांसाहारी अन्न आणि समान नागरी संहिता, तुम्हाला नक्की काय म्हणायचंय?' असा प्रश्न त्यांना नेटिझन्सने विचारलाय.'अन्नाचा UCC शी काहीही संबंध नाही.' ही अशीच अवस्था आहे खासदारांची. जे नेहमीच चुकीची माहिती पसरवतात'अशी प्रतिक्रिया एका यूजरने दिली. 'लोकांनी काय खावे आणि काय खाऊ नये हे सांगण्याचा अधिकार सरकारला नाही. आधी प्रदूषण आणि उघड्यावर शौचास जाणे यासारख्या मोठ्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा.', असा सल्लाही एका युजरने शत्रुघ्न सिन्हा यांना दिला.
2024 च्या लोकसभा निवडणुकीत शत्रुघ्न सिन्हा यांनी आसनसोल (पश्चिम बंगाल) जागा जिंकली होती. त्यांनी भारतीय जनता पक्षाचे सुरिंदरजीत सिंग अहलुवालिया यांचा 59 हजार 564 मतांनी पराभव केला होता. शत्रुघ्न सिन्हा हे शेवटचे 2018 मध्ये 'यमला पगला दीवाना: अगेन' या चित्रपटात मोठ्या पडद्यावर दिसले होते. या चित्रपटात त्यांनी न्यायाधीशाची भूमिका साकारली होती. दरम्यान कालांतराने त्यांनी राजकारणाचा मार्ग स्वीकारला.