Home Loan चा हफ्ता महागणार की...; व्याजदराबाबत RBI गव्हर्नर स्पष्टच बोलले

Reserve Bank of India: रिझर्व्ह बँकेच्या वतीनं काही दिवसांपूर्वीच पतधोरण जाहीर करत रेपो रेट जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. ज्यानंकर आता देशातील आर्थिक स्थितीसंदर्भात आरबीआयच्या वतीनं काही गोष्टी सुस्पष्ट करण्यात आल्या आहेत.   

सायली पाटील | Updated: Oct 19, 2024, 08:17 AM IST
Home Loan चा हफ्ता महागणार की...; व्याजदराबाबत RBI गव्हर्नर स्पष्टच बोलले  title=
Reserve Bank of India governer Shaktikanta Das on inflation and interest rate

Reserve Bank of India: रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी असणाऱ्या शक्तिकांता दास यांनी नुकतंच एका कार्यक्रमादरम्यान काही गोष्टींबाबत स्पष्ट वक्तव्य केली. दास यांच्या वक्तव्यामुळं आता आरबीआयकडूनच आर्थिक स्थितीसंदर्भातील कैक गोष्टी अधोरेखित झाल्या. त्यातील एक म्हणजे व्याजदर. 

सध्यातरी देशात व्याजदराक घट होणार नसल्याचं दास यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. देशभरात महागाई वाढली असून, येत्या काळात या महागाईत घट होण्याची काहीच चिन्हं नाहीत. अशा परिस्थितीमध्ये व्याजदर कमी करण्याचं संकट आपण ओढावू शकत नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँकेच्या व्याजदरांमध्ये घट झाल्यानंतर आरबीआयकडूनही असा निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. पण, केंद्रीय बँकेनं मात्र असा कोणताही निर्णय होणार नसल्याचं स्पष्ट केलं. 

दास यांच्या म्हणण्यानुसार महागाईच्या दृष्टीनं पुढील 6 महिने अतिशय संवेदनशील आहेत. पुढील काही दिवसांत महागाई 4 टक्क्यांवर येईल असे संकेतही दास यांनी दिले. ब्लूमबर्ग इंडिया क्रेडिट फोरममध्ये ते बोलत होते. 'सध्या व्याजदरांमध्ये घट केल्यास त्यामुळं आर्थिक संकट ओढावू शकतं. यासाठीच महागाईच्या दरावर करडी नजर ठेवणंही अतिशय गरजेचं आहे. तुमचा आर्थिक विकासदर चांगला राहिल्यास यामध्ये कोणत्याही बदलाची गरज नाही. पण, महागाई दर 4 टक्क्यांच्या नजीक पोहोचला तर, आम्ही व्याजजरात कपात करण्यासंदर्भात विचार करु शकतो. यासाछी आपल्याला आकडेवारीची प्रतीक्षा करावी लागेल', असं दास यांनी उपस्थितांसमोर म्हटलं. 

हेसुद्धा वाचा : Maharashtra Weather News : ऑक्टोबर हिटमध्ये करा पावसाळी सहलीचा बेत; राज्याच्या 'या' भागांमध्ये वीजांच्या कडकडाटासह मुसळधार 

जगातील इतर मोठ्या बँका व्याजदरात कपात करत असतानाच आपण सध्यातरी या रांगेत येऊ इच्छित नसल्याचं सांगत त्यांनी आरबीआयची भूमिका स्पष्ट केली. योग्यवेळी आपण योग्य तो निर्णय घेऊ, सध्या मात्र आपण 'वेट अँड वॉच' याच भूमिकेत आहोत, असंही दास यांनी अधोरेखित केलं. इतर केंद्रीय बँकांच्या निर्णयांचा परिणाम अर्थव्यवस्थेवरहोताना आम्ही पाहत आहोत. पण, आमच्याकडून देशातील महागाई, आर्थिक वृद्धी आणि अर्थव्यवस्थेला प्राधान्य दिलं जात असून आपण एक्सचेंज रेट व्यवस्थापन करत नाही, तर डॉलरच्या खरेदी आणि विक्री गरजांनुसार करतो असंही सूचक वक्तव्य त्यांनी केलं. दास यांचं एकंदर वक्तव्य पाहता गृहकर्ज किंवा तत्सम कर्जांच्या व्याजदरात सध्यातरी कोणतीही घट किंवा दिलासा मिळणार नाही हेच स्पष्ट होत आहे.