Parenting Tips: छोट्या-छोट्या गोष्टींवरून लहान मुलांमध्ये राग अनावर होत असल्याचं चित्र बऱ्याचदा दिसून येतंय़. अनेक मुले, तर रागाच्या भरात चुकीचे पाऊल उचलतात.त्यामुळे तुमची मुलं जर सतत चिडचिड करत असतील
आजकालची लहान मुलं मोबाईल फोन आणि ऑनलाईन गेमच्या आहारी गेल्याचं दिसतंय. मोबाईल फोन आणि गेममुळे मुलांच्या मनावर नकारात्मक परिणाम होत असल्याचं अनेक अहवालातून समोर आलंय. मुलांना राग येतो म्हणून पालकांनी त्यांच्या उलट रागवण्याऐवजी त्यांच्या रागाचं कारण जाणून घेण्याची अधिक गरज आहे. मुलांशी बोलून त्यांच्या रागाची कारणं समजून घेण्याचा आणि त्यांच्यासोबत वेळ घालवण्याचा सल्ला मानसोपचार तज्ज्ञांनी दिलाय.
मुलांच्या रागामागची कारणं काय आहेत? हे जाणून घेऊया. आई-वडिलांकडून पुरेसा वेळ न मिळणं हे महत्वाचं कारण आहे. मुलं स्वत:ला एकटे समजू लागले की रागीट होत जातात. घरातील वातावरणाचा मुलांवर प्रभाव पडतो, मोबाईल फोनमधील आशयाचाही परिणाम होत असतो.मुलांचा राग नियंत्रणात ठेवायचा असेल तर पालकांनी मुलांकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे.
पालकांनी आपल्या वागणुकीवर लक्ष केंद्रीत करावं.मुलांसोबत अधिक वेळ घालवावा.मुलांवर हात उगारू नये. मुलांसमोर चिडचिड करणं टाळावं. मुलांना राग आल्यास प्रेमाने समजून घ्यावं. मुलांच्या विविध उपक्रमांचं वेळापत्रक करून त्यांना व्यस्त ठेवावं.अशी काळजी तुम्ही घेऊ शकता.
हल्लीच्या काळात वाढलेला स्क्रीन टाईम यामुळे मुलांच्या वागणुकीत बदल होतायत. या गोष्टी हाताबाहेर जावू नये म्हणून पालकांना या धावपळीच्या जगात आपल्या मुलांनाही वेळ देणं गरजेचं आहे.