Beed Parbhani Issue: दिल्लीतील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात बीड हत्या आणि परभणी प्रकरणासंदर्भातला ठराव मांडण्यात आलाय. दरम्यान हा ठराव मांडल्यानंतर महामंडळाच्या बैठकीत खडाजंगी झाली. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
दिल्लीतल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मस्साजोग आणि परभणी घटनेवरून पडसाद उमटलेत. मराठवाडा साहित्य परिषदेनं यासंदर्भात मांडलेल्या ठरावावरून साहित्य महामंडळाच्या बैठकीत खडाजंगी झाली. संतोष देशमुखांचा खून आणि त्यावरून मंत्री धनंजय मुंडेंवर होणारे आरोप तसंच सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणाचेही संमेलनात पडसाद उमटलेत. संमेलनाच्या समारोपाच्या पूर्वसंध्येला झालेल्या महामंडळाच्या बैठकीत संमेलनात मांडण्याच्या ठरावांवर चर्चा केली जाते. या बैठकीत मराठवाडा साहित्य परिषदेने सध्या गाजत असलेल्या मराठवाड्याच्या प्रश्नांसंबंधीचा ठराव मांडला.
‘सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू, संतोष देशमुख यांचा भरदिवसा केलेला खून, गाजत असलेला मंत्र्यांचा भ्रष्टाचार, मंत्र्यांच्या हस्तकाची खंडणीखोरी, हे मराठवाड्याला लागलेले ग्रहण आहे. या घटना हिमनगाचे केवळ टोक असून देशातही मणिपूरसारख्या ठिकाणीही हेच घडते आहे. यावर ठिकठिकाणची सरकारे केवळ बोलघेवडेपणा आणि पक्षपातीपणा करत आहेत. हे चित्र बदलण्यासाठी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी स्वपक्षीय राजकारणाचा विचार न करता ही गुंडगिरी संपवण्याची हमी देण्याची मागणी हे संमेलन करत आहे’, असं या ठरावात म्हटलंय.
गेल्या 2 महिन्यांपासून मस्साजोग आणि परभणी प्रकरणावरून राज्यातलं वातावरण तापलेलं आहे. यातील राजकीय कनेक्शनवरूनही गंभीर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. अशास्थितीत आता थेट साहित्य संमेलनात या प्रकरणाचे पडसाद उमटलेत. त्यामुळे मराठवाडा साहित्य परिषदेनं मांडलेला ठराव स्वीकारला जाणार का, याकडे लक्ष लागलंय.