योगेश खरे (प्रतिनिधी) मुंबई : बुरखा बंदीवरून महायुती सरकारमध्ये विसंवाद असल्याचं समोर आलं आहे. दहावी-बारावी परीक्षेत गैरप्रकार रोखण्यासाठी मंत्री नितेश राणेंनी बुरखा बंदीची मागणी केली होती. मात्र नितेश राणेंच्या या मागणीला शालेय शिक्षणमंत्री दादा भुसेंचा खो मिळाला आहे.
दहावी आणि बारावीच्या परीक्षा केंद्रावर बुरखा घालण्यावरून नव्या वादाला तोंड फुटलंय. बुरखा घालून येणा-या परिक्षार्थ्यांना बाहेरच रोखण्यात यावं, अशी मागणी मत्सव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी केलीय. परीक्षेत होणारी कॉपी रोखण्यासाठी बुरखाबंदी गरजेची असल्याचं राणेंनी म्हटलं आहे.
नितेश राणेंच्या या मागणीला चक्क शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनीच खो दिलाय. कॉपीमुक्त परीक्षा आपल्या शिक्षण विभागाचं अभियान राहिलं असून कुणी कॉपी करणार नाही याची काळजी विभाग घेतो, असं मंत्री दादा भुसे यांनी नितेश राणेंच्या मागणीवर म्हटलं आहे.
हेही वाचा : मोठी बातमी! बेपत्ता शिवसेना नेते अशोक धोडींचा मृतदेह सापडला, गाडीच्या डिक्कीत ठेवला होता लपवून
नितेश राणेंच्या मागणीला धार्मिक तेढची किनार असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी केलाय. बुरखा घातलेलेच कॉपी करतात हा केवळ बालिशपणा असल्याचा टोलाही आव्हाड यांनी लगावला.
नितेश राणेंची बुरखाबंदीची मागणी विशिष्ट हेतूनं असल्याचा आरोप होतोय. पण त्यांच्या या मागणीला त्यांचेच मंत्रिमंडळातील सहकारी असलेल्या शिवसेनेच्या मंत्र्यांनी केराची टोपली दाखवलीय. या निमित्तानं सरकारमधील मतभेद उघड झाल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु झालीये.