राहुल गांधीमध्ये नेतृत्व करण्याची क्षमताच नाहीये- उद्धव

राहुल गांधींचा ‘जय’ काँग्रेसवाले करणारच हो, पण त्या जयजयकारात देश सामील नाही. किती निवडणुका ते लढले? स्वत: नाही, मी पक्ष म्हणून बोलतोय.

Updated: Jan 31, 2013, 10:46 AM IST

www.24taas.com, मुंबई
राहुल गांधींमध्ये नेतृत्व क्षमता नसल्याची टीकाही त्यांनी केली. तसंच काँग्रेस-राष्ट्रवादीलाही टार्गेट केले. मॅरेथॉन मुलाखतीमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची भूमिका पुढं नेणार असल्याचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं. `राहुल गांधींचा ‘जय’ काँग्रेसवाले करणारच हो, पण त्या जयजयकारात देश सामील नाही. किती निवडणुका ते लढले? स्वत: नाही, मी पक्ष म्हणून बोलतोय. आता वेगळं आणखी ते काय करणार आहेत. देशाचं नेतृत्व करण्याची जर का कुवत त्यांच्यात असती तर आतापर्यंत ती दिसली का नाही?` अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
एऩडीएनं पंतप्रधानपदाचा उमेदवार अगोदरच ठरवला पाहिजे. असं मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलंय. बाळासाहेबांनी जसं सुषमा स्वराजाचं नाव सुचवलं. तसं तुमच्याकडं कोणतं नाव असेल तर पुढं आणा. त्यावर चर्चा करण्याची आपली तयारी असल्याचं उद्धव यांनी स्पष्ट केलं आहे.
त्यामुळं शिवसेना आता सुषमा स्वराज यांच्या नावासाठी अडून बसणार नसल्याचं दिसून येतं आहे. सामना वृत्तपत्रात सुरु असलेल्या दीर्घ मुलाखतीच्या आजच्या शेवटच्या भागात त्यांनी विविध विषयांवर मत व्यक्त केली.